उत्तराखंडमधील पावसाच्या थैमानामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत केदारनाथाच्या खालील भागात अडकलेल्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय लष्कराने तेहरीकडे जाणारा मार्ग खुला केल्यामुळे या मार्गाने गौरीकुंड आणि आसपासच्या भागात अडकलेल्या पर्यटकांची सुटका करण्यास सुरुवात झालीये.
सद्यस्थितीत हजारो भाविक गौरीकुंडमध्ये अडकलेले आहेत. गौरीकुंडला जोडणारे रस्ते पावसाच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे त्याचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. गुरुवारी रात्री लष्कराचे जवान हेलिकॉप्टरच्या साह्याने गौरीकुंडला पोहोचले. गौरीकुंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांना कशा पद्धतीने बाहेर काढता येईल, याचे नियोजन सैन्यदल करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून तेहरीकडे जाणाऱया रस्त्याने पर्यटकांना गौरीकुंडमधून बाहेर काढण्याची योजना आखण्यात आली.
केदारनाथमधील पर्यटकांना बाहेर काढण्यात यश आलेले असले, तरी उत्तराखंडच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अद्याप ५० हजारांहून अधिक भाविक अडकलेले आहेत. या भाविकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर सध्या प्रयत्न करण्यात येत आहेत.