नवी दिल्ली : लडाखच्या गोग्रा-हॉट स्प्रिंग भागातील भारत आणि चिनी सैन्याच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही सर्व प्रक्रिया पाच दिवस चालणार असून ती पाच टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाईल. गलवानमधील अनुभव लक्षात घेता या संपूर्ण काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सावधगिरी बाळगण्याचे आदेश स्थानिक लष्करी अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आगेकूच थांबवणे, निश्चित स्थळांपर्यंत सैनिकांची माघार, तात्पुरती बांधकामे हटवणे, परिसर पूर्वी होता त्या स्थितीत आणणे आणि उभयपक्षी मान्य झालेल्या ठिकाणांपर्यंत मागे जाणे या पाच टप्प्यांत ही प्रक्रिया होईल. यावर वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह मुख्य सुरक्षा सल्लागार अजित डोवाल दिल्लीतून लक्ष ठेवून आहेत.