Air India Advisary: भारत-पाकिस्तान दरम्यान सायंकाळ नंतर ड्रोन हल्ले सुरू झाल्यानंतर एअर इंडियाने प्रवाशांसाठी राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या सूचना जाहीर केल्या आहेत. विमान उड्डाणाच्या वेळेआधी किमान तीन तास लवकर विमानतळावर पोहोचावे, असे एअर इंडियाने प्रवाशांना सांगितले आहे. देशभरातील विमानतळांवर सुरक्षा प्रोटोकॉल वाढविण्यात आला असून नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने दिलेल्या आदेशानंतर ही सूचना जाहीर करण्यात आली आहे. उड्डाण घेण्याच्या ७५ मिनिटं आधी आता चेक-इन काऊंटर बंद करण्यात येणार आहेत.

बुधवारी (७ मे) भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबविल्यानंतर पाकिस्तानकडून जम्मूच्या सीमेवरील गावांमध्ये बेछूट गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. या हल्ल्यात १६ नागरिकांना प्राण गमवावे लागले. यानंतर गुरुवारी सायंकाळी पुन्हा एकदा पाकिस्तानकडून जम्मू, पंजाबच्या सीमाभागात ड्रोन हल्ले करण्यात आले.

तत्पूर्वी गुरुवारी (८ मे) सकाळी पाकिस्तानने श्रीनगर पासून ते गुजरातच्या भूजपर्यंत पसरलेल्या सीमेवरील भारतीय लष्कराच्या तळावर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारताने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत सर्व ड्रोन निकामी केले. याशिवाय थेट लाहोर येथे असलेली डिफेन्स रडार सिस्टिम उध्वस्त केली.

वाढत्या ड्रोन हल्ल्यामुळे आता सीमाभागातील व्यावसायिक उड्डाणे प्रभावित झाली आहेत. जोधपूर, अमृतसर, लेह, जम्मू आणि काश्मीरमधील विमानतळावरील अनेक उड्डाणे रद्द झाली आहेत, तर काही विमानांना उशीर होत आहे. जे विमानतळ बंद करण्यात आली आहेत. त्याची यादी खालीलप्रमाणे…

ज्या प्रवाशांना विमान प्रवास करायचा आहे. त्यांनी एअरलाइन्स आणि विमानतळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच प्रवासासाठी बराच वेळ लागू शकतो, याची तयारी करून ठेवा, असाही सल्ला सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे.