आर्यन खान अमली पदार्थ प्रकरणात अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) पंच असलेले प्रभाकर साईल (३७) यांचा चेंबूर येथील निवासस्थानी मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्यामुळे शुक्रवारी साईलचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिली. आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरूख खानकडे २५ कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील आठ कोटी रुपये एसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप साईलनी केला होता. आता प्रभाकर साईल यांच्या मृत्यूवरुन शिवसेनेनं शंका उपस्थित केली आहे. या प्रकरणाचे वानखेडेंशी आणि पर्यायाने राजकीय संबंध असल्याचा उल्लेख करत शिवसेनेनं या प्रकरणाला, ‘सगळेच रहस्यमय’ असं म्हटलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मारुती कांबळेचे काय झाले? या प्रश्नाप्रमाणेच प्रभाकर साईलचे काय झाले? तो का मेला? असे प्रश्न सगळ्यांना पडले आहेत. दोन दिवसांपूर्वी नागपुरातून अ‍ॅडव्हकेट सतीश उके यांना ‘ईडी’ने एका जमीन घोटाळा प्रकरणात अटक केली. जमीन घोटाळा हे निमित्त आहे. अ‍ॅडव्हकेट उके यांच्या अटकेचे कारण राजकीय दहशत निर्माण करणे हेच आहे. अ‍ॅडव्हकेट सतीश उके यांनी गंभीर अपराध, आर्थिक किंवा जमीन घोटाळे केले हे मान्य केले तरी ईडीने पहाटे घुसून त्यांना जेरबंद करण्यासाठी मनी लॉण्डरिंग, हवाला, स्मगलिंगसारखी ती प्रकरणे नव्हती. महाराष्ट्राचे पोलीस अशा प्रकरणांचा तपास करून गुन्हेगारांना शासन करण्यास समर्थ आहेत. पोलीस कमी पडले असते तर विरोधी पक्षाने त्या विरोधात आवाज उठविला असता, पण सतीश उके यांना ‘ईडी’ने ताब्यात घेतले व तुरुंगात डांबले. सतीश उके यांनाही आपल्या जिवाची भीती वाटत आहे. त्यामुळे गृहमंत्री वळसे-पाटील यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहायलाच हवे,” असं शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून म्हटलंय.

“सतीश उके यांना जेरबंद केल्यावर प्रभाकर साईलचा आवाज कायमचा बंद केला आहे. प्रभाकर साईल कोण, हे एव्हाना लोकांच्या लक्षात आलेच असेल. शाहरुख खानचा पुत्र आर्यन खान याचे कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण गाजले होते. आर्यनला ड्रग्ज प्रकरणात सरळ सरळ फसविण्यात आले. आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, त्याने ड्रग्जचे सेवन केले नाही. तरीही एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्यनला अटक करून सनसनाटी निर्माण केली. याच प्रकरणात खंडणी मागण्याचाही प्रकार घडला. आर्यनला कसे फसवले, एनसीबीचे अधिकारी धनिकांना खोट्या प्रकरणांत कसे अडकवत आहेत, याचा पर्दाफाश प्रभाकर साईल याने केला. प्रभाकर साईल हा असा एक साक्षीदार ठरला की, त्याने एनसीबी अधिकाऱ्यांचे रॅकेट उद्ध्वस्त करून देशात खळबळ माजवली,” असं लेखात म्हटलंय.

“समीर वानखेडेंचा मुखवटाच या प्रभाकरमुळे फाटला. राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक यांनी क्रूझ ड्रग्ज प्रकरण कसे बोगस आहे हे टप्प्याटप्प्याने पुराव्यांसह बाहेर काढले. त्यातला एक महत्त्वाचा साक्षीदार प्रभाकर साईल होता. प्रभाकरमुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा बनावटपणा समोर आला. आता अचानक प्रभाकर साईलचा मृत्यू झाला. हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले गेले, पण मृत्यू संशयास्पद आहे असे खुद्द गृहमंत्री वळसे-पाटील यांनाच वाटत आहे व त्यांनी पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले आहेत. या सर्व प्रकरणातला खोटारडेपणा उघड करणारे मंत्री नवाब मलिक यांना ‘ईडी’ने आधीच तुरुंगात डांबले आहे. आता पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला. प्रभाकर हा क्रूझ ड्रग्ज प्रकरणातला प्रत्यक्ष साक्षीदार होता,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

“भारतीय जनता पक्षाचा अजेंडा चालविणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या विरोधात प्रभाकर साईल निर्भयपणे उभा राहिला व शेवटपर्यंत तो सत्य बोलत राहिला. केंद्रीय तपास यंत्रणांचा खेळ त्याच्या साक्षीने कोलमडून पडला. मोदी यांनीच पंतप्रधान म्हणून प्रभाकरच्या मृत्यूकडे गांभीर्याने पाहायला हवे. कोणी सरकारविरुद्ध तक्रार केली की, ‘ईडी’चा ससेमिरा लावायचा, धाडींवर धाडी घालायच्या, कोणी सत्य सांगणारी साक्ष दिली की, त्याच्या जिवावर उठायचे असेच एकंदरीत दिसते. प्रभाकरने आर्यन खान प्रकरणात एनसीबी अधिकाऱ्यांवर आठ कोटींच्या वसुलीचा आरोप लावला होता. त्यामुळे झोनल डायरेक्टर वानखेडे हे अडचणीत सापडले होते व त्यांना एनसीबीतून बाहेर जावे लागले,” असा उल्लेख या लेखात आहे.

“महाराष्ट्रातच नव्हे तर एकंदरीतच देशात जे खूनशी राजकारण सुरू आहे ते अस्वस्थ करणारे आहे. प्रभाकर साईलने सत्य सांगितले नसते तर आर्यन खानप्रमाणे अनेक जण यापुढेही केंद्रीय यंत्रणांच्या मनमानीचे व खंडणीखोरीचे बळी गेले असते. प्रभाकरच्या सत्य कथनाने कित्येक आर्यन खान बळी जाण्यापासून वाचले. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण हे एक राजकीय षड्यंत्र होते. ज्या पद्धतीने भाजपाचे पुढारी त्या काळात केंद्रीय यंत्रणांची कड घेऊन भांडत होते, तो सर्वच प्रकार किळसवाणा होता. भाजपाचे लोक पायाखाली चिरडलेल्या मुंगीच्या बाबतीतही शोक संवेदना व्यक्त करून ठाकरे सरकारला जाब विचारतात, पण प्रभाकर साईलच्या संशयास्पद मृत्यूमुळे त्यांना साधी हळहळ वाटू नये याचे आश्चर्य वाटते,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

“एनसीबीचे अधिकारी ज्या भाजपा पुढाऱ्यांबरोबर त्या काळात ऊठबस करीत होते, त्यांनी प्रभाकर साईलच्या मृत्यूबाबत समाजमाध्यमांवर व्यक्त केलेल्या भावना रहस्यमय तितक्याच संशयास्पद आहेत. प्रभाकर साईलचा मृत्यू रहस्यमय आहे या संशयास त्यामुळे बळकटीच मिळते. प्रभाकरचे काय झाले? त्याचा मनसुख हिरेन झाला काय? असे प्रश्न भाजपाच्याच गोटातून निर्माण व्हावेत. त्यामुळे संशयाचा भोवरा जिथे फिरायचा त्याच दिशेने फिरताना दिसत आहे. धाडसाने जे सत्य बोलत आहेत ते एकतर तुरुंगात ढकलले जात आहेत किंवा प्रभाकर साईलप्रमाणे संशयास्पदरीत्या मरण पत्करत आहेत. महाराष्ट्राच्या गृहखात्याने हे आव्हान स्वीकारायला हवे,” असं लेखाच्या शेवटी म्हटलंय.

साईल नक्की चर्चेत का आलेले?
साईल माहूल परिसरात राहत होते. प्रथमदर्शनी साईल यांचा मृत्यू नैसर्गिक वाटत असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रभाकर साईल यांच्या आई मुंबईतील अंधेरी परिसरात राहतात.  साईलनी प्रतिज्ञापत्राद्वारे अनेक धक्कादायक खुलासे केले होते. प्रभाकर यांच्या दाव्यानुसार, या प्रकणातील दुसरे पंच के. पी. गोसावी आणि सॅम डिसूझाचे आपण दूरध्वनीवरील संभाषण ऐकले होते. २५ कोटींचा बॉम्ब टाका. १८ कोटीपर्यंत व्यवहार अंतिम करू. त्यातील आठ कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असे या दोघांमध्ये संभाषण झाल्याचा प्रभाकर यांनी दावा केला होता. आपण के. पी. गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही प्रभाकर यांनी केला होता. आरोपानुसार, क्रुझवर छापेमारी झाल्यानंतर शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि के. पी. गोसावी तसेच सॅमला निळ्या रंगाच्या मर्सिडिजमध्ये पाहिले होते. या तिघांमध्ये १५ मिनिटे चर्चा झाली होती, असेही त्यांनी सांगितले होते. या वेळी साईल यांनी आपल्या कुटुंबाला धोका असल्याची भीतीही व्यक्त केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aryan khan drugs case witness prabhakar sail dead shivsena raised doubt about death scsg
First published on: 04-04-2022 at 08:00 IST