Jammu Kashmir Tourism Down By 90 per cent : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर जम्मू काश्मीरमधील पर्यटन व्यवसाय ठप्प होत आहे. बहुतेक राज्यांमधून पर्यटकांचे आलेले बुकिंग्स रद्द झाले असून व्यावसायिकांना आता दक्षिणेकडील राज्यांकडून आशेचा किरण दिसत आहे. कारण, दक्षिणेकडील राज्यांकडून येणाऱ्या पर्यटकांनी अद्याप बुकिंग रद्द केलेले नाहीत. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

दक्षिणेकडील राज्यांकडून आशेचा किरण

“जे काही नुकसान व्हायचे होते ते झाले आहे”, असं काश्मीरच्या ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशनचे अध्यक्ष रौफ त्रंबू म्हणाले. “काही प्रमाणात बुकींग रद्द झाले असून नवे बुकिंग्स आलेले नाही”, असंही ते म्हणाले. ट्रम्बू म्हणाले की, या पर्यटन हंगामात पाच ते सहा हजार कोटी रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता आहे, विशेषतः गुजरात, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटन रद्द करत आहेत. तर उत्तर भारतीय राज्यांकडून फारसं पर्यटन होत नाही. पण दक्षिण भारतीयांकडून फार कमी वेळा रद्द केलं जातं. त्यांचं योगदान २०-२५ टक्के आहे आणि त्यामुळे आम्हाला आशेचा किरण मिळाला आहे”, असं ट्रम्बू म्हणाले.

काश्मीरमधील पर्यटन हंगाम मार्चच्या मध्यापासून सुरू होतो आणि जूनच्या मध्यापर्यंत टिकतो. कारण, या काळात भारतातील बहुतेक भागांमध्ये उन्हाळी सुट्ट्या जाहीर केल्या जातात. जुलै आणि ऑगस्ट फार मोठ्या प्रमाणात पर्यटन होत नाही. परंतु सप्टेंबरमध्ये पर्यटकांचा ओघ पुन्हा वाढतो.

९० टक्क्यांनी पर्यटन व्यवसाय घसरला

“जे घडले त्यामुळे आम्ही जाहिरातींमध्येही मंदावलो आहोत. उन्हाळा आता संपला आहे; आता आम्ही शरद ऋतू आणि हिवाळ्यासाठी नियोजन करत आहोत”, असंही त्यांनी स्पष्ट केलं. काश्मीर हाऊसबोट ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष मंजूर अहमद पख्तून म्हणाले, “सरकारकडे अचूक आकडेवारी असेल. पण रद्द झालेल्या बुकिंग्सवरून आपल्याला असं दिसून येतं की पर्यटन ९० टक्क्यांनी कमी झालं आहे. ५ एप्रिल ते ९ जूनपर्यंत, हाऊसबोट्स पूर्णपणे भरलेले असायचे, पण इथे फारसे कोणीच नव्हते. त्यातच सरकारने ४९ पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद केल्याने आमच्या अडचणी अधिक वाढल्या.

“आता आमच्याकडे तीन प्रमुख पर्यटन स्थळे उरली आहेत – गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगाम. जर एखादा पर्यटक पहलगामला गेला तर तो अरु, बैसरन किंवा बेताब खोऱ्यात जाऊ शकत नाही”, असं त्रंबू म्हणाले. श्रीनगरचा रहिवासी मुजमिल अहमद वाणी, नोकरी सोडल्यानंतर दोडापथरी येथे एक रेस्टॉरंट बांधत होता. श्रीनगर शहरापासून ४५ किमी अंतरावर असलेल्या बडगाममधील दोडाप्ताहरी रिसॉर्ट हे बंद करण्याच्या यादीतील ४९ क्षेत्रांपैकी एक आहे. “मी माझी अभियांत्रिकीची नोकरी सोडली आणि रिसॉर्टचे काम करण्यासाठी कर्ज घेतले. ते आता स्थानिकांसाठीही बंद आहे”, अशी खंत त्याने व्यक्त केली.

बांदीपोरा येथील नियंत्रण रेषेवरील गुरेझ हे खोरे काश्मीरमधील पर्यटक आणि स्थानिकांसाठी बंद करण्यात आले आहे. गुरेझ इन हॉटेल अँड रेस्टॉरंट चालवणारे मेहमूद अहमद म्हणाले, “सैन्यदलाने त्रागबल येथे (गुरेझच्या मार्गावर) एक चौकी उभारली आहे आणि कोणालाही पुढे जाण्याची परवानगी नाही. सर्व बुकिंग रद्द करण्यात आली आहेत. माझ्याकडे सहा कर्मचारी होते आणि मला पाच जणांना कामावरून काढून टाकावे लागले.”