Asaduddin Owaisi On India Pakistan ceasefire : पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमेवर मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देत ७ मे रोजी मध्यरा‍त्री भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या हद्दीत एअर स्ट्राईक करत मोठी कारवाई केली. या भारतीय लष्कराच्या कारवाईनंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले करण्याचं सत्र सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान भारताने पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे हल्ले यशस्वीरीत्या परतवून लावले.

भारत व पाकिस्तानदरम्यान शनिवारी १० मे रोजी संध्याकाळी ५ वाजेपासून शस्त्रविराम लागू करण्यावर सहमती दर्शवण्यात आली. दोन्ही देशातील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये फोनवरून चर्चा झाल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. दरम्यान शस्त्रविरामादरम्यान अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये मध्यस्थी केल्याची बाबा समोर आली आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंबंधी माहिती दिली आहे. दरम्यान यानंतर एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.

असदुद्दीन ओवेसी यांनी यांनी यासंबंधी सोशल मीडीय प्लॅटफॉर्म एक्सवर भली मोठी पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये त्यांनी भारतीय लष्कराला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. याबरोबरच पाकिस्तानी हल्ल्यात मृत्यू तसेच जखमी झालेल्यांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. याबरोबरच त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीबद्दल प्रश्न देखील उपस्थित केले आहेत.

असदुद्दीन ओवेसी नेमकं काय म्हणाले?

असदुद्दीन ओवेसी यांनी केलेल्या पोस्टमध्ये दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदारांना सोडू नये असे म्हटले आहे. “जोपर्यंत पाकिस्तान भारताच्या विरोधात दहशतवादासाठी त्यांच्या भूमिचा वापर करत राहिल, तोपर्यंत स्थिर शांतता शक्य नाही. शस्त्रविराम होवो किंवा न होवो आपण, आपण पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार दहशतवाद्यांचा पाठलाग करणे सोडू नये.”

“जेव्हा जेव्हा परकीय आक्रमण झालं आहे मी सरकार आणि सशस्त्र दलांच्या पाठीशी उभा राहलो आहे. हा पाठिंबा कायम राहील. आपल्या सशस्त्र सेनेचे शौर्य आणि त्यांची कौतुकास्पद कुशलतेसाठी त्यांचे आभार मानतो. मी लष्कराचे जवान एम. मुरली नायक, एडीडीसी राज कुमार थापा यांना मानवंदना देतो आणि संघर्षाच्या काळात मृत्यू झालेल्या किंवा जखमी झालेल्या सर्व लोकांसाठी प्रार्थना करतो,” असेही ओवेसी पुढे म्हणाले आहेत.

ओवेसी यांनी यावेळी काही अपेक्षा देखील बोलून दाखवल्या आहेत, तसेच त्यांनी राजकीय पक्षांना संघर्षाच्या काळात एकजुट दाखवण्याचे आवाहन देखील केले आहे. “मी अपेक्षा व्यक्त करतो की शस्त्रविरामामुळे सीमा भागात राहाणाऱ्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. मी ही देखील अपेक्षा व्यक्त करतो की भारतीय आणि भारतीय राजकीय पक्ष गेल्या दोन आठवड्यांपासून काहीतरी धडा घेतील. भारत तेव्हा मजबूत असतो जेव्हा सर्व भारतीय एकजूट असतात. आपण जेव्हा एकमेकांबरोबर भांडतो तेव्हा त्याचा शत्रू फायदा घेतात,” असे ओवेसी म्हणाले आहेत.

इतकच नाही तर ओवेसी यांनी यावेळी सरकारला काही प्रश्न देखील विचारले आहेत

माझे काही प्रश्न आहेत, आणि माझी अपेक्षा आहे की सरकार यावर स्पष्टीकरण देईल –

१) शस्त्रविरामाची घोषणा नरेंद्र मोदी यांनी करायला हवी होती, कुठल्यातरी परदेशी देशाच्या राष्ट्राध्यक्षाने नाही. आपण शिमला करार (१९७२) यानंतर तिसर्‍या पक्षाने मध्यस्थी करण्याचा विरोध करत आलो आहोत. मग आता आपण ती का स्वीकारली? मला आशा आहे की काश्मीरचा मु्द्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जाणार नाही, कारण की ही आपली अंतरिम बाब आहे.

२) आपण कुठल्यातरी तिसर्‍या ठिकाणी चर्चा करण्यासाठी का तयार झालो? या चर्चेचा अजेंडा काय असेल? पाकिस्तान त्यांच्या भूमिचा वापर दहशतवादासाठी करणार नाही याची अमेरिका गॅरंटी देत आहे का?

३) आपण भविष्यात पाकिस्तानला दहशतवादी हल्ले करण्यापासून रोखण्याचे उद्दिष्ट साध्य केले आहे का? आपला उद्देश ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या माध्यमातून शस्त्रविराम करणे होते की पाकिस्तानला अशा स्थितीत घेऊन येणे होते जेथे तो दुसर्‍या अशा हल्लाचा विचार स्वप्रातही करू शकणार नाही?

४) आपण पाकिस्तानला एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्येच ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मोहिम सुरू ठेवली पाहिजे.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले होते?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये शस्त्रविरामावर सहमती झाल्याची पोस्ट केली आह. “रात्रभर अमेरिकेच्या मध्यस्थीने सविस्तर चर्चा केल्यानंतर भारत व पाकिस्तानने पूर्णपणे व तातडीने शस्त्रविराम करण्यावर सहमती दर्शवल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. यासाठी मी दोन्ही बाजूंचं अभिनंदन करतो”, असं ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटंल होतं.