Pakistan Is a Failed Nation Says Asaduddin Owaisi: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दहशवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानवर जगभरातून टीका होता. याचबरोबर देशातील सर्व पक्षही राजकारण बाजूला ठेऊन केंद्र सरकारबरोबर उभे आहेत. अशात एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नुकतेच पाकिस्तानला फटकारले आहे. त्यांनी पाकिस्तानचे वर्णन “एक अपयशी राष्ट्र”, असे केले आहे. याचबरोबर पाकिस्तान भारताला शांततेने जगू देणार नाही, असेही म्हटले आहे.

हैदराबादचे खासदार असलेल्या ओवैसी यांचा काल त्यांच्या मतदारसंघात एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात बोलताना ओवैसी यांनी केंद्र सरकारला पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान विरुद्ध कठोर पावले उचलण्याचा विचार करण्याचे आवाहन केले.

अपयशी पाकिस्तानपेक्षा…

या कार्यक्रमात पुढे बोलताना ओवैसी म्हणाले की, “अपयशी देश असलेल्या पाकिस्तानपेक्षा भारत कायमच खूप भक्कम आहे आणि पुढेही राहील. पाकिस्तानला त्याच्या विविध वांशिक गटांमध्ये शांतता प्रस्थापित करता आलेली नाही, तसेच इराण आणि अफगाणिस्तानसारख्या इतर शेजारी देशांशी त्याचे सौहार्दपूर्ण संबंध नाहीत. मोदी सरकारने त्यांच्या जहाजे आणि विमानांच्या हालचालींवर निर्बंध लादले आहेत हे योग्य आहे, परंतु फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स ग्रे लिस्टसारखी आणखी पावले उचलली पाहिजेत.”

जिना यांना नाकारले…

यावेळी ओवैसी यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या अलीकडील भारतविरोधी वक्तव्यांवरही टीका केली.

“त्यांनी (मुनीर) हे लक्षात ठेवावे की, भारतात राहणाऱ्या मुस्लिमांनी १९४७ मध्ये जिना यांना नाकारले होते आणि त्यांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांचे वंशज कोणत्याही परिस्थितीत ही भूमी सोडणार नाहीत,” असे ओवैसी यांनी ठामपणे सांगितले.

बांगलादेशच्या लष्करी अधिकाऱ्यावरही टीका

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर बांगलादेशने चीनच्या ईशान्येकडील राज्ये काबीज करण्यासाठी सहकार्य करावे, या बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याच्या वक्तव्यावरही ओवैसी यांनी आक्षेप घेतला. ओवैसी म्हणाले, “तुम्ही हे लक्षात ठेवावे की स्वतंत्र देश म्हणून तुमचे अस्तित्व भारतामुळे आहे.”

पाकिस्तानी आयात आणि जहजांवर बंदी

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता भारताने शनिवारी पाकिस्तानी ध्वजधारी जहाजांना भारतीय बंदरात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या निर्देशानुसार, पाकिस्तानी ध्वजधारी जहाजांना भारतीय बंदरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या निर्देशानुसार भारताच्या ध्वजधारी जहाजांनाही पाकिस्तानातील बंदरांवर डॉकिंग करण्यास बंदी घालण्यात आली आहे.