ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सीमेवर चिनी घुसखोरी आणि जम्मू -काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनवर बोलण्यास नेहमीच घाबरतात. चहामध्ये साखरही टाकत नाही जेणेकरून चीनचा उल्लेख होऊ येऊ नये. काश्मीरमध्ये बाहेरील लोकांच्या हत्या आणि चीनकडून घुसखोरीच्या घटनांवरून ओवेसींनी मोदी सरकारचा खरपूस समाचार घेतला. मोदींना सांगू इच्छितो की ते दोन गोष्टींबद्दल तोंड उघडत नाही. एक म्हणजे पेट्रोल आणि डिझेलची महागाई आणि दुसरी चीनची घुसखोरी. चीन आपल्या देशात घुसून बसला आहे असे ओवेसी म्हणाले.

“जेव्हा पाकिस्तानने पुलवामा हल्ला केला, तेव्हा मोदी म्हणाले की आम्ही घरात घुसून मारू, मग आम्ही मारा असे सांगितले. आता चीन डोकलाम, डेपसांगमध्ये बसला आहे आणि भारताचे पंतप्रधान काहीच करत नाहीत. त्यांना चीनबद्दल बोलायला भीती वाटते. आम्हाला भारताच्या पंतप्रधानांना विचारायचे आहे की सैन्याचे नऊ सैनिक मारले गेले आहेत आणि २४ तारखेला भारत आणि पाकिस्तानचे टी २० आयोजित करण्याची तयारी करण्यात येत आहे. भारतीय सैनिक मरत आहेत आणि मनमोहन सिंग सरकार पाकिस्तानला बिर्याणी खायला घालत आहे, असे तुम्ही म्हटले होते ना? नऊ सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही टी २० खेळणार आहात? आज पाकिस्तान काश्मीरमध्ये भारतीयांच्या जीवाशी टी २० खेळत आहे, पण तुम्ही काय करत आहात?  आयबी, अमित शाह काश्मीरमध्ये काय करत आहेत?,” असा सवाल ओवेसी यांनी केला आहे.

“पाकिस्तानकडून दहशतवादी, हत्यारे येत आहेत. आपण सीजफायर केले आहे, पण ड्रोनमधून शस्त्रे येत आहेत. दहशतवादाला सामोरे जाण्यासाठी तुमच्याकडे कोणतेही धोरण नाही. काश्मीरमध्ये ज्या प्रकारे टार्गेट किलिंग होत आहे त्याला सामोरे जाण्यासाठी तुमच्याकडे कोणतेही धोरण नाही,” असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानसोबत युद्धबंदी का केली असा थेट प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केला. यानंतरही ड्रोनमधून शस्त्रे येत आहेत आणि दहशतवादी घुसखोरी करत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये या महिन्यात आतापर्यंत ११ लोकांची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे.