आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते यांच्या 'भारत जोडो'मधील लूकची खिल्ली उडवली आहे. राहुल गांधी सद्दाम हुसेन यांच्यासारखे दिसत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. काँग्रेसने भाजपाच्या टीकेला उत्तर दिलं असून "जेव्हा तुमच्या नेत्याने (पंतप्रधान) दाढी वाढवली होती, तेव्हा आम्ही काही बोललो नव्हतो. आम्ही महत्त्वाच्या मुद्द्यांवरच चर्चा करतो," असं काँग्रेसने म्हटलं. अहमदाबादमधील प्रचारसभेत बोलताना हेमंत बिस्वा सरमा यांनी म्हटलं की "काही दिवसांपूर्वी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत मी राहुल गांधी यांच्या दिसण्यावर मला काहीच समस्या नसल्याचं म्हटलं होतं. पण जर तुम्ही लूक बदलला असेल तर किमान वल्लभभाई पटेल किंवा पंडित नेहरु यांच्यासारखा करा. गांधींजींसारखे दिसलात तर आणखीनच उत्तम, पण तुम्ही आता सद्दाम हुसेनसारखे का दिसत आहात?". "यामुळेच काँग्रेस नेत्यांचं वागणं भारतीय संस्कृतीच्या जवळ जाणारं नाही. ते नेहमी इतरांच्या संस्कृतीचं पालन करतात," असं आसामचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. काँग्रेसने भाजपाला फटकारलं काँग्रेसच्या प्रवक्त्या अलका लांबा यांना भाजपाला फटकारलं आहे. "राहुल गांधी यांनी हेमंत बिस्वा सरमा यांच्यापेक्षा आपल्या निष्ठावंत श्वानाला जास्त महत्त्व दिलं हे बरं झालं," असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे संदीप दीक्षित म्हणाले आहेत की "मला तर भाजपावर हसू येत आहे. भारत जोडो यात्रेला घाबरुन त्यांची पातळी इतकी खालावेल असं वाटलं नव्हतं. त्यांच्या नेत्यानेही (पंतप्रधान मोदी) दाढी वाढवली होती. पण आम्ही काहीच म्हटलं नव्हतं. आम्ही योग्य मुद्दयावर बोलतो. पंतप्रधान आपल्याविरोधात कट आखला जात असल्याचं म्हणाले आहेत. कट बंद दाराआड आखले जात असतात, लाखो लोक सहभागी झालेल्या यात्रेत नाही".