आज २२ सप्टेंबर, म्हणजेच वर्ल्ड ऱ्हायनो डे अर्थात जागतिक गेंडा दिवस आहे. खरंतर अशा कोणत्याही दिवशी संबंधित व्यक्ती, घटना किंवा प्राणीमात्राविषयी आदर, सन्मान किंवा आठवण काढली जाते. पण आसाम सरकारने आजच्याच दिवशी थोडी थोडकी नव्हे, तर जवळपास २५०० गेंड्याची शिंगं जाळून टाकली आहेत. आणि खास आजच्या दिवसाचं निमित्त साधून ही शिंगं जाळून टाकण्यात आली आहेत. आसामच्या गोलाघाट जिल्ह्याच्या बोकाखाट भागात ही शिंगं जाळण्यात आली आहेत. काझीरंगा अभयारणं आणि व्याघ्रप्रकल्पापासून नजीकच हे सर्व करण्यात आलं आहे. याबाबतचं कारण सरकारनं जाहीर केलं, तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.

सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, एकूण २ हजार ४७९ शिंगं जाळण्यात आली आहेत. तर ९४ शिंगं ही संशोधन आणि प्रशिक्षणासाठी ठेवली जाणार आहेत. खुद्द मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा यांनीच हेलिकॉप्टरमधून ही शिंगं जाळण्याची प्रक्रिया सुरू केली. आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करताना हिमंता बिस्व शर्मा यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे.

का जाळली शिंगं?

हिमंता बिस्व शर्मा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “गेंड्यांची शिंगं औषधी म्हणून वापरण्याचा एक समज आहे. पण ते खरं नसून फक्त दंतकथा आहे. एकशिंगी गेंडे हे फक्त आपल्या जैवविविधतेचा एक घटक नसून ते आपल्या वारशाचं एक प्रतिक आहे”. गेंड्यांच्या शिंगांबद्दल असलेल्या याच चुकीच्या समजाला खोडून काढण्यासाठी ही शिंगं जाळण्यात आल्याचं आसाम सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

संपूर्ण जगात आसाममध्ये एक शिंगी मोठ्या गेंड्यांची संख्या सर्वाधिक आहे. काझीरंगा, मानस आणि ओरंग नॅशनल पार्कमध्ये सुमारे २६०० एकशिंगी गेंड्यांचं वास्तव्य आहे.