निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवारांविषयी नापसंती व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य निवडणूक आयोगाने दिले खरे, परंतु मतदारांनी व्यक्त केलेल्या या मतांचा आदर मात्र राखला जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे. यंदाच्या निवडणुकीपासून मतदानयंत्रावर ‘वरीलपैकी कोणीही नाही’ (नोटा) हा पर्याय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिला होता. मात्र, त्यावर शिक्कामोर्तब केलेल्या मतदारांचे मत वायाच जाणार आहे. नोटावर मतदारांनी शिक्कामोर्तब केले असले तरी ती बाद मते ठरवली जातील, असे खुद्द निवडणूक आयोगानेच स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबरमध्ये दिलेल्या आदेशावरून मतदानयंत्रावर ‘नोटा’ हा पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. पाचही राज्यांच्या निवडणुकांत त्याचा प्रथम वापर करण्यात आला. अनेक मतदारांनी ‘नोटा’वर शिक्कामोर्तबही केले. मात्र, आता त्यांचे हे मत वाया जाणार आहे. कारण ‘नोटा’ची मते बाद धरण्यात येतील व उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होण्यासाठी ती ग्राह्य़ धरली जाणार नाहीत, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.