तामिळनाडूतल्या कराईकुडी या ठिकाणी दोन बसेसची टक्कर होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात ११ जण ठार झाले. मृतांमध्ये आठ महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. या घटनेत ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. वरिष्ठ जिल्हा पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दोन बसेसची धडक इतकी जोरदार होती की ११ जणांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी अपघाताबाबत नेमकी काय माहिती दिली?

या दोन बसेसची टक्कर नेमकी कशी झाली? नेमकं काय घडलं ते कारण अद्याप स्पष्ट नाही असं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान पीटीआय या वृत्तससंस्थेला माहिती देताना पोलिसांनी हे स्पष्ट केलं की अपघात इतका भीषण होता की ११ जणांचा जागीच मृत्यू झाला. या ठिकाणी अपघात झाल्यानंतर एकच हलकल्लोळ होता. स्थानिकांच्या मदतीने या ठिकाणी बचावकार्यही राबवण्यात आलं अशी माहिती पोलिसांनी दिली.

प्रत्यक्षदर्शीने अपघाताविषयी काय सांगितलं?

“बसचा अपघात हा समथवूपुरम या ठिकाणी झाला. दोन्ही बसेसची एकमेकांना टक्कर बसली. त्यातली एक बस कनगयामची होती तर दुसरी बस कराईकुडीची होती. दोन्ही बस सरकारी बस सेवेतील आहेत. या अपघातात आठ महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा मृत्यू झाला. आम्ही अपघात होताच मदतीसाठी आलो. आम्हाला काहींनी सांगितलं की एका महिला बसमध्ये येण्यासाठी स्टॉपवर उभी होती. त्याचवेळी समोरुन बस आली आणि या बसला धडक दिली ज्यात हा अपघात झाला.”

दोन्ही बसेसमध्ये एकूण ५५ प्रवासी बसले होते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही बसेसमध्ये मिळून एकूण ५५ प्रवासी बसले होते. या अपघातात जे जखमी झाले आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. अनेकांना अपघात अचानक झाल्याने मानसिक धक्का बसला आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रवाशांचे हात, पाय फ्रॅक्चर झाले आहेत. काही प्रवाशांना डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे.