जम्मूमध्ये लागोपाठ झालेले दोन हल्ले हा लष्कराच्या मोहिमांमुळे खचलेल्या दहशतवाद्यांनी त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा परिणाम आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटले आहे.
दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये केलेल्या हल्ल्यांबाबत प्रश्न विचारला असता पर्रिकर म्हणाले की, ज्या वेळी विरोधकांचे मनोधैर्य खचते, त्या वेळी ते उंचावण्यासाठी ते असे प्रयत्न करतात. या वर्षी लष्कराने २६ दहशतवाद्यांना ठार मारले असून फक्त १ सैनिक ठार झाला आहे. लष्कर अधिक चांगली कामगिरी करत असून गुप्तचर सेवाही सुधारली असल्याचे यावरून सिद्ध होते. संपूर्ण सीमेवर गस्त ठेवणे कठीण असल्याचेही त्यांनी सांगितले.