Ram Mandir Donation Controversy : गेल्या काही दिवसांपासून अयोध्येतील श्रीराम मंदिर देणगी अपहार प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे. श्रीराम मंदिरात भाविकांकडून अर्पण केल्या जाणार्या देणग्या आणि मौल्यवान वस्तूंचा कथित अपहार झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी शुक्रवारी आठ जणांना अटक करत मोठी कारवाई केली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी देखील सुरू आहे.
अयोध्येतील राम मंदिर देणगी कथित अपहार प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या सगळ्या प्रकरणात एसआयटीच्या प्राथमिक अहवालात देणगी व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता प्रशासकीय पातळीवर मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिराचे आर्थिक आणि प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’ आता मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) नियुक्त करण्याच्या हालचाली करत असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त सूत्रांच्या हवाल्याने न्यूज १८ ने दिलं आहे.
श्रीराम मंदिरात भाविकांच्या देणग्यांची कथित चोरी झाल्याच्या प्रकरणानंतर आता श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. श्रीराम मंदिराचे आर्थिक आणि प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी लवकरच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येण्याची शक्यता आहे.
ट्रस्टने निवेदनाद्वारे काय म्हटलं?
श्रीराम मंदिरात देणग्यांची कथित चोरी झाल्याच्या प्रकरणावर ट्रस्टने आज एक निवेदन जारी करत म्हटलं की, “श्री राम मंदिरा संदर्भात गेल्या काही दिवसांत समोर आलेल्या घटनांमुळे आम्हाला धक्का बसला आहे. आम्ही अत्यंत व्यथित व दुःखी झालो आहोत. मात्र, भविष्यात अशी दुर्दैवी परिस्थिती उद्भवू नये यासाठी आम्ही आवश्यक ती पावलं उचलण्याचं आश्वासन देत आहोत.”
चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांचा राजीनामा
अयोध्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या अत्यंत आक्रमक आणि कडक भूमिकेनंतर ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’मध्ये मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.
SIT च्या अहवालानंतर कारवाई
राम मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणगीच्या हाताळणीत आणि देखरेखीत मोठ्या प्रमाणावर निष्काळजीपणा झाल्याचं ‘एसआयटी’च्या प्राथमिक चौकशीत उघड झालं होतं. हा अहवाल समोर येताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणात कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका घेतली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अखेर चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. दरम्यान, क्राईम ब्रँच आणि विशेष तपास पथकाने गुरुवारी या प्रकरणात ८ जणांना अटक करत मोठी कारवाई केली. या अटकेच्या अवघ्या २४ तासांच्या आत ट्रस्टच्या दोन बड्या नेत्यांनी राजीनामा दिल्यामुळे संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
