Bangladesh Protests : बांगलादेशमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देश सोडला. त्यानंतर शेख हसीना या भारतात दाखल झाल्या, अर्थात त्यांनी भारतात तात्पुरता आश्रय घेतला. मात्र, शेख हसीना या बांगलादेश सोडून भारतातच का आल्या? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्या भारतात येण्यामागे काही कारणे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बांगलादेशमध्ये सध्या राजकीय अस्थिरतेची स्थिती निर्माण झाली आहे. अभूतपूर्व राजकीय सत्तापालट बांगलादेशमध्ये झालं. गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ सत्तेवर असलेल्या शेख हसीना यांनी तडकाफडकी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देश सोडला. याचं कारण असं की गेल्या काही महिन्यांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशात वातावरण तापलं होतं. यानंतर हिंसाचाराची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे शेख हसीना यांना देश सोडावा लागला.

हेही वाचा : शेख हसीना पायउतार झाल्याने भारताचं मोठं नुकसान? माजी ब्रिगेडियर म्हणाले, “आपल्यासाठी हे गंभीर आहे, कारण…”

एवढंच नव्हे तर शेख हसीना यांना देश सोडण्याचा निर्णय अवघ्या ४५ मिनिटांत घ्यावा लागला. देश सोडण्यासाठी त्यांना लष्कराकडून फक्त ४५ मिनिटे देण्यात आले होते. सध्याही बांगलादेशमध्ये मोठ्या घडामोडी सुरु असून अद्यापही बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरु आहे. हजारो आंदोलक रस्त्यावर असून ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत आहेत. बांगलादेशातील लष्कर तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.

शेख हसीना भारतात का आल्या?

बांगलादेश सोडल्यानंतर शेख हसीना यांनी भारतात येण्याची विनंती केली होती, अशी माहिती भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी दिली. “शेख हसीना यांनी भारतात येण्यासाठी अचानक विनंती केली”, असं एस.जयशंकर यांनी आज संसदेत सांगितलं. दरम्यान, शेख हसीना या भारतात येण्याचं कारणं म्हणजे बांगलादेश आणि भारत या दोन्ही देशाचे संबंध चांगले आहेत. तसेच शेख हसीना यांचे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी चांगले संबंध होते. शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे मित्र होते. शेख मुजीबुर रहमान यांच्या हत्येनंतर शेख हसीना यांनी अनेक वर्षे दिल्लीतच आश्रय घेतला होता. दरम्यान, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील विरोधी पक्ष काँग्रेस अशा दोघांशीही शेख हसीना यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर भारतात येण्याचा निर्णय घेतला असावा, असं बोललं जात आहे.

शेख हसीना यांची पुढची योजना काय?

बांगलादेशमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर शेख हसीना यांनी भारतात तात्पुरता आश्रय घेतला असला तरी त्यांच्या आश्रयासंदर्भात भारताने अद्याप ठोस कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शेख हसीना यांच्या पुढील नियोजनाबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, यावरून सर्वपक्षीय बैठकीत राहुल गांधींनी सरकारला शेख हसीना यांच्या पुढील नियोजनाबाबतही विचारणा केली. मात्र, त्यावर सविस्तर उत्तर देण्यास जयशंकर यांनी नकार दिला. “भारत सरकारनं यासंदर्भात शेख हसीना यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. मात्र, त्यासंदर्भातली माहिती आत्ताच उघड करता येणार नाही”, असं जयशंकर यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangladesh protests why did sheikh hasina come to india after leaving bangladesh what is the reason gkt