गुरुवारी एअर इंडियाच्या विमानात एक विचित्र घटना घडली. दिल्लीहून अमेरिकेसाठी उड्डाण घेतलेल्या विमानात गोंधळ उडाला. विमानात चक्क वटवाघूळ आढळले. त्यामुळे वैमानिकाने विनाम परत घेण्याचा निर्णय घेतला. वटवाघूळ विमानात आले कसे, असा प्रश्न सर्वांनाचा पडला होता. एअर ट्रॅफिक कंट्रोलला माहिती दिल्यानंतर वैमानिकाने विमान परत घेण्याचा निर्णय घेतला.

एअर इंडियाचे हे विमान दिल्ली – न्यूजर्सी दरम्यान प्रवासी वाहतुकीसाठी वापरले जाते. विमानाने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन वेळेवर सकाळी २.२० वाजता उड्डाण केले. उड्डाण घेऊन ३० मिनिटे झाल्यानंतर विमानात वटवाघूळ दिसले. त्यानंतर कॅप्टनने विमान परत घेण्याचा निर्णय घेतला.

एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, ‘प्रस्थानानंतर AI-105 DEL-EWR हे विमान परत आणले गेले. क्रू सदस्यांना केबिनमध्ये एक वटवाघूळ आढळले. त्यानंतर वन्यजीव कर्मचार्‍यांना ते केबिनमधून काढून टाकण्यास सांगितले. पहाटे ३.५५ वाजता विमान दिल्ली विमानतळावर सुरक्षित परतले. त्यानंतर प्रवाशांना दुसर्‍या विमानात हलविण्यात आले.

डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा विमान परत आले तेव्हा त्यातून मृत वटवाघूळ बाहेर काढण्यात आले. दरम्यान, इंजिनीअरिंग टीमला यासंदर्भात सविस्तर अहवाल तयार करण्यास सांगण्यात आल्या होते. त्यानुसार केटरिंगसारखे वाहने लोड करण्यामुळे वटवाघूळ विमानात आले असल्याची शक्यता इंजिनीअरिंग टीमने अहवालात व्यक्त केली.