Pm Narendra Modi Meeting on Operation Sindoor : पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरच्या दहशतवादी तळांवर हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात १०० हून दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा दावा भारत सरकारकडून करण्यात येतोय. दरम्यान, बुधवारी मध्यरात्री हा हल्ला झाल्यानंतर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी विभाग आणि मंत्रालयांच्या सचिवांबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत सर्व विभागांना एकमेकांशी समन्वय साधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पंतप्रधांनांनी सचिवांबरोबर घेतलेल्या बैठकीत नागरी संरक्षण यंत्रणा मजबूत करणे, चुकीची माहिती आणि बनावट बातम्यांना आळा घालण्याचे प्रयत्न आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची सुरक्षा सुनिश्चित करणे हे विषय चर्चेत आले होते. पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनानुसार, मोदींनी मंत्रालयांमध्ये समन्वय ठेवण्याचे आवाहन केले आणि त्यांना राज्य अधिकारी आणि तळागाळातील सरकारी संस्थांशी समन्वय साधण्यास सांगण्यात आले आहे.

आवश्यक यंत्रणांचे फूल-प्रूफ कामकाज सुनिश्चित करा

कॅबिनेट सचिव आणि पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांव्यतिरिक्त, संरक्षण, गृह, परराष्ट्र, माहिती आणि प्रसारण, ऊर्जा, आरोग्य आणि दूरसंचार मंत्रालयांचे सचिव उपस्थित होते. मंत्रालयांमधील नियोजन, तयारी आणि समन्वयाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मंत्रालयाच्या कामकाजाचा व्यापक आढावा घेण्याचे आणि आवश्यक यंत्रणांचे फूल-प्रूफ कामकाज सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले.

अधिकाऱ्यांनी आपत्कालीन प्रतिसादावर लक्ष केंद्रित करावं आणि मंत्रालये त्यांच्या प्रक्रिया मजबूत करत आहेत”, सचिवांनी परिस्थितीसाठी “संपूर्ण-सरकारी” दृष्टिकोनासह त्यांचे नियोजन तपशीलवार मांडले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

देश संवेदनशील काळातून जात असताना सतत सतर्कता, संस्थात्मक समन्वय आणि स्पष्ट संवाद साधण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय सुरक्षा, ऑपरेशनल तयारी आणि नागरिकांची सुरक्षा राखण्याचेही आवाहन यामार्फत करण्यात आले आहे.