पंजाबमधील सत्तेची सूत्रे हाती घेताच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शुक्रवारी बेरोजगारी दूर करण्यासाठी मोठा निर्णय घेतला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शनिवारी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिली मंत्रिमंडळ बैठक घेतली. पंजाब सरकारच्या मंत्र्यांनीही आज सकाळी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पहिल्या कॅबिनेट बैठकीत भगवंत मान यांनी सरकारी नोकऱ्यांबाबत काही महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेतले आहेत. पंजाब मंत्रिमंडळाने शनिवारी पंजाब पोलीस विभागात १०,०० आणि इतर सरकारी विभागांमधील १५,००० रिक्त पदांसह एकूण २५,००० सरकारी नोकऱ्या प्रदान करण्याचा ठराव मंजूर केला. पंजाबमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर शनिवारी भगवंत मान मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. या बैठकीत राज्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी पहिले पाऊल उचलण्यात आले. पंजाब मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी मंत्र्यांना शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात एका महिलेसह आम आदमी पक्षाच्या (आप) दहा आमदारांचा समावेश करण्यात आला आहे. पंजाब सरकार पंजाबमधील महामंडळ आणि सरकारी कार्यालयांमधील रिक्त पदेही भरणार आहे. भगवंत मान मंत्रिमंडळानेही व्होट ऑन अकाउंट आणण्याचा निर्णय घेतला आहे. तर सरकारचा संपूर्ण अर्थसंकल्प जून महिन्यात सादर केला जाईल. पंजाब निवडणुकीदरम्यान आम आदमी पक्षाने तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. पहिल्या कॅबिनेट बैठकीत २५,००० रिक्त पदे भरण्याचा निर्णय हा आम आदमी पक्षाचा जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी मान सरकारचे पहिले पाऊल आहे. पंजाब भवन येथे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या १० मंत्र्यांपैकी आठ पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. या सर्वांनी पंजाबी भाषेत शपथ घेतली. हरपाल सिंग चीमा, हरभजन सिंग, डॉ. विजय सिंगला, लाल चंद, गुरमीत सिंग मीत हेअर, कुलदीप सिंग धालीवाल, लालजीत सिंग भुल्लर, ब्रह्म शंकर झिम्पा, हरजोत सिंग बैंस आणि डॉ. बलजीत कौर यांना शपथ देण्यात आली. मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह १८ पदे आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर भगवंत मान यांनी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जारी करण्याबाबत भाष्य केले. “भगतसिंग यांच्या हौतात्म्यादिवशी आम्ही भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन क्रमांक जारी करू. तो माझा वैयक्तिक व्हॉट्सअॅप नंबर असेल. जर कोणी तुमच्याकडे लाच मागितली तर त्याचा व्हिडिओ/ऑडिओ रेकॉर्ड करून मला पाठवा. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. पंजाबमध्ये यापुढे भ्रष्टाचार चालणार नाही,” असे भगवंत मान यांनी ट्वीट करत म्हटले होते.