पाटणा : सरकार तपास करीत असलेले आणि हक्कभंग समितीकडेही पाठवण्यात आलेले एखादे प्रकरण सभागृहात ‘वारंवार’ उपस्थित करता येऊ शकते काय, यावरून मुख्यमंत्री नितीश कुमार व अध्यक्ष विजय कुमार यांच्यात खडाजंगी झाल्यामुळे बिहार विधानसभेत सोमवारी तिखट प्रसंग उद्भवला. आपला मतदारसंघ असलेल्या लखिसरायमध्ये घडलेल्या घटनेबाबत काय कारवाई केली याची सभागृहाला माहिती द्यावी, असे अध्यक्षांनी मंत्री बिजेंद्र यादव यांना दोन दिवसांनी सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उठून संताप व्यक्त केला. ‘सरकारच्या वतीने उत्तर देण्याचे अधिकार मंत्र्यांना देण्यात आले आहेत. या घटनेबाबत चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले असताना, तुम्ही त्यांना दोन दिवसांनंतर पुन्हा उत्तर द्यायला सांगता. हे नियमाविरुद्ध आहे. कृपया घटनेत काय लिहिले आहे ते पाहा’, असे कुमार म्हणाले. लखिसरायमधील एका पोलीस उपअधीक्षकांनी आणि एका ठाणेदाराने काही दिवसांपूर्वी अध्यक्षांसोबत केलेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे निर्देश सभागृहाच्या हक्कभंग समितीने पोलीस महासंचालकांना दिले आहेत. या चौकशीच्या मुद्यावरून अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांच्यातील संघर्षांत कुमार यांच्या नेतृत्वाखालील जद (यू) आणि अध्यक्षांचा पक्ष भाजप यांच्यातील तणावपूर्ण संबंधांचे प्रतििबब पडत असल्याचे काहीजणांचे मत आहे.