बिहारमध्ये काही दिवसांपूर्वी पूल चोरी गेल्याच्या घटनेची देशभरात चर्चा झाली. रोहतास जिल्ह्यात झालेल्या या घटनेचा पोलिसांनी केवळ तपास केला नसून या गुन्ह्यातील पांढरपेशांसह सरकारी अधिकाऱ्यांनाही अटक केलीय. रोहतास जिल्ह्यातील अमियावरमध्ये सोननहरमधील पूल चोरीला गेला होता. हा पूल उपविभागीय अधिकारी आणि राष्ट्रीय जनता दलाचे विभाग प्रमुख यांनी मिळून विकला.

६० फूट लांब आणि ५०० टन वजनाच्या पुलाच्या चोरीचा पोलिसांनी वेगाने तपास केला. तसेच जलसंपदा विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यासह ८ आरोपींना बेड्या ठोकल्या. याशिवाय स्थानिक राजदचा विभाग प्रमुख शिवकल्याण भारद्वाज यालाही अटक करण्यात आली. पोलिसांनी पुल चोरीसाठी वापरण्यात आलेला जेसीबी, गॅस कटरसह ३ हजार १०० रुपये जप्त केले आहेत.

नेमकं काय घडलं?

या प्रकरणी रोहतासचे पोलीस अधीक्षक आशिष भारती दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी विशेष तपास पथकाचं गणन करण्यात आलं होतं. त्याचं निरिक्षण पोलीस अधीक्षक स्वतः करत होते. तपासात या पुलाच्या साहित्याचं वजन अमियावर धर्मकाट्यावर करण्यात आल्याचं समोर आलं.

हेही वाचा : “दारु पिणारे भारतीय नाहीत, ते तर महापापी”; बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं विधान

नासरीगंजचे विभागीय अधिकारी राधेश्याम सिंह यांच्या इशाऱ्यावरच ही संपूर्ण चोरी करण्यात आली. याशिवाय यात अमियावर गावातील राजद नेते शिवकल्याण भारद्वाज यांचाही सहभाग होता. आरोपी शिवकल्याणने इतर आरोपींकडून १० हजार रुपये घेऊन ही चोरी पूर्ण केली.