नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानदरम्यान तणाव वाढत असताना, देशांतर्गत मात्र भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये राजकीय युद्ध पेटले आहे. राहुल गांधींचे विश्वासू अजय राय यांनी, ‘‘राफेल लढाऊ विमाने लिंबू-मिरची लावून हँगरमध्ये ठेवायला आणली आहेत का, पाकिस्तानविरुद्ध कारवाई कधी करणार,’’ असा प्रश्न विचारून सोमवारी भाजपला डिवचले. त्यामुळे संतापलेल्या भाजपच्या नेत्यांनी, काँग्रेस नेत्यांवर देशाच्या लष्कराचे मनोधैर्य खच्ची करण्याचा आरोप केला.

काँग्रेसचे नेते ‘पाचवा स्तंभ’ बनून पाकिस्तानसाठी काम करत असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ता व राज्यसभेतील खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. सीमेवर पाकिस्तान आपल्यावर तोफगोळे फेकत आहे. आपण त्याला प्रत्युत्तर देत आहोत. पण, भारताच्या सीमेच्या आतूनच काँग्रेस व ‘इंडिया’ आघाडीतील नेता आक्षेपार्ह विधानांचे ‘तोफगोळे’ फेकून देशाच्या लष्कराचे मनोधैर्य खच्ची करत आहेत. काँग्रेस केंद्र सरकारला पाठिंबा देत असल्याचे सांगत असला तरी, या पक्षाचे नेते मात्र देशविरोधी विधाने करत आहेत असा आरोप करत त्यांनी काँग्रेसची तुलना पाकिस्तानबरोबर केली.

राय यांची टीका

अजय राय यांनी खेळण्यातील विमानाला ‘राफेल’ असल्याचे दाखवले व त्याला लिंबू-मिरची लावून, ही राफेल विमाने हँगरमध्ये पडून आहेत, असे म्हणत केंद्र सरकारची खिल्ली उडवली. ‘‘दहशतवाद्यांना धडा शिकवण्याची केंद्र सरकार केवळ भाषा करते, प्रत्यक्षात कारवाई करत नाही. राफेल विमाने आणल्यानंतर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या विमानांना लिंबू-मिरची लावली होती. आता ही विमाने हँगरमध्येच आहेत,’’ असे अजय राय म्हणाले. राफेल विमाने चांगलीच आहेत. या राफेल विमानांचा वापर करून केंद्र सरकारने शत्रूला प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे अजय राय यांनी स्पष्टीकरण दिले.