आपल्या कार्यकर्त्यांची संख्या एवढी आहे की त्यांनी नुसतं थुंकलं तरी हे सरकार वाहून जाईल असं वक्तव्य भाजपाच्या सरचिटणीस डी पुरंदेश्वरी यांनी केलं आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल आणि त्यांच्या कॅबिनेटचा उल्लेख करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आपले कार्यकर्ते इतके आहेत की त्यांनी मागे वळून नुसतं थुंकलं तरी मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ वाहून जाईल असं त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान भुपेश बघेल यांनी आपल्याला त्यांच्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती अशी प्रतिक्रिया दिली आहे.

छत्तीसगडमधील भाजपाच्या सरचिटणीस पुरंदेश्वारी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना २०२३ मधील निवडणूक जिंकण्यासाठी काम करण्याचं आवाहन केलं. बस्तर जिल्ह्यात आयोजित चिंतन शिबीरमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी बघेल सरकारकडून आदिवसांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप केला.

त्यांनी म्हटलं की, “छत्तीसगडमधील जनता सत्ताधारी पक्षाला योग्य उत्तर देईल. तुम्ही सर्वांनी संकल्प करुन काम करण्याचं आवाहन मी करत आहेत. तुम्ही मागे वळून थुंकलात तरी भुपेश बघेल आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ वाहून जाईल”. दरम्यान भुपेश बघेल यांनी प्रतिक्रिया देताना, जर कोणी आकाशात थुंकलं तर ते त्यांच्या चेहऱ्यावर पडतं असा टोला लगावला आहे.