काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वेड लागले असून त्यांना मनोरूग्णालयात पाठवले पाहिजे असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री अश्विनी चौबे यांनी केले आहे. राहुल गांधी यांना स्क्रिझोफेनिया जडला आहे. त्यांना लवकरात लवकर मनोरूग्णालयात उपचारासाठी दाखल केले पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आकाशाएवढे उत्तुंग आहेत. त्यांच्यापुढे राहुल गांधी म्हणजे नाल्यातील किड्याप्रमाणे आहेत असेही चौबे यांनी म्हटले आहे.

देशाच्या पंतप्रधानाबाबत राहुल गांधी यांनी अपशब्द वापरले आहेत. मात्र राहुल गांधी हे एखाद्या नाल्यातील किड्याप्रमाणे आहेत ते स्वतःच भारत काँग्रेस मुक्त करतील असे अश्विनी चौबे यांनी म्हटले आहे. तसेच महाआघाडीला त्यांनी ठगबंधन आहे असे म्हटले आहे. महाठगआघाडीच्या नेत्यांना जनतेची हाय लागणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राहुल गांधी खोटारडे म्हणतात. मात्र राहुल गांधी स्वतःच देशात खोट्या गोष्टी पसरवत आहेत. दुसऱ्यांना वेडे म्हणणाऱ्या राहुल गांधी यांनी स्वतःकडे पाहिले पाहिजे त्यांना कोण वेडे समजेल. राफेल कराराबाबत जे खोटे राहुल गांधी पसरवत आहेत. खोटा प्रचार करत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोपांची चिखलफेक करत आहेत. मात्र त्यांच्या या आरोपांमध्ये तथ्य नाही. ते मनोरूग्ण झाले आहेत त्यामुळे त्यांना मनोरूग्णालयात दाखल केले जावे अशीही मागणी चौबे यांनी केली आहे. राहु गांधी यांच्यावर टीका करताना भाजपाच्या मंत्र्यांचा जीभेवरचा ताबा सुटला आहे हेच यातून दिसून येते.