तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने भाजपा खासदार अरविंद धर्मपुरी यांनी केसीआरवर जोरदार प्रहार केला आहे. निजामाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार धर्मपुरी म्हणाले, केसीआर यांनी पंतप्रधान मोदींशी पंगा घेतला तर त्यांचे राजकीय जीवन संपुष्टात येईल. केसीआर यांनी शेतकऱ्यांसोबत आंदोलन करणार असल्याचे म्हटले होते. तसेच तेलंगणातील नागरिकांना पुरस्कार न दिल्यामुळे टीका केली होती. 

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना धर्मपुरी म्हणाले की, “जेव्हा गिधडाचा मृत्यू जवळ येतो तेव्हा तो शहराकडे धावतो. तसेच आता केसीआर (के चंद्रशेखर राव) यांच्या राजकीय मृत्यूची वेळ आली आहे, म्हणून ते मोदींशी पंगा घेत आहेत आणि केंद्र सरकारशी खोटे बोलत आहेत.”

शेतकऱ्यांचा संदर्भ देत धर्मपुरी म्हणाले की, “काय पेरणी करावी आणि काय करू नये, हे ना आम्ही कधी शेतकऱ्यांना सुचवले आहे, ना आम्ही शेतकऱ्यांकडून पीक खरेदी करणार नाही, असे कधी सांगितले नाही. केसीआर जनतेची दिशाभूल करत आहेत.” तसेच पुरस्कारासाठी राज्यातील लोकांची मुख्यमंत्र्यांनी शिफारस का केली नाही, असा सवाल देखील धर्मपुरी यांनी केला. 

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी सोमवारी मोदी सरकारवर तेलंगणातील लोकांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले होते की, मोदी सरकार आपल्या राज्यातील जनतेला जाणीवपूर्वक पुरस्कार देत नाही.