विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना इतका वेळ लागत आहे त्यावरून जद(यू) आणि राजदमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत, असा हल्ला भाजपने सोमवारी चढविला.
राजदचे नेते लालूप्रसाद यादव आणि त्यांचे कुटुंबीय कन्येच्या विवाहाचे कारण देऊन नितीशकुमार यांच्या शपथविधी समारंभापासून दूर राहिले. यावरूनच दोन्ही पक्षांमध्ये सर्व आलबेल नाही हे सिद्ध होते, असे भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी यांनी म्हटले आहे.
माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तीन दिवसांतच विश्वासदर्शक ठराव मांडला होता. स्वत: नितीशकुमार यांनी २०१० मध्ये पाच दिवसांत विश्वासदर्शक ठराव मांडला होता. मात्र आता नितीशकुमार यांना १६ मार्चपूर्वी बहुमत सिद्ध करावयाचे आहे, तीन आठवडय़ांहून अधिक कालावधी आहे.