लोकसभा निवडणुकांच्या देशभरातील निकालांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी भाजपला दिलेल्या पाठिंब्याबद्दल जनतेचे आभार मानले. या निकालांच्या रूपाने देशातील जनतेने भाजपच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. लोकसभा निवडणुकांचे हे निकाल म्हणजे देशाच्या इतिहासातील महत्वपूर्ण घटना असून, नरेंद्र मोदींनी या निवडणुकीसाठी घेतलेल्या अथक प्रयत्नांचे खऱ्या अर्थाने चीज झाल्याचे राजनाथ सिंहांनी सांगितले. तसेच १९८४ नंतर देशातील जनतेने पहिल्यांदाच एखाद्या पक्षाला इतक्या स्पष्टपणे बहुमत दिले असल्याचे राजनाथ यांनी सांगितले. या निवडणुकीत भाजप विकास आणि सुव्यवस्थेचा मुद्दा घेऊन जनतेसमोर गेले होते. भाजपच्या या भूमिकेचा जनतेने स्विकार केल्यामुळे आगामी काळात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली नवीन भारताचे स्वप्न साकारण्यचा प्रयत्न भाजप करेल अशी घोषणा राजनाथ यांच्याकडून करण्यात आली. भाजपच्या या पत्रकारपरिषदेत अमित शहा, वैंकय्या नायडूसुद्धा उपस्थित होते.