लालमणी वर्मा, एक्स्प्रेस वृत्त
नवी दिल्ली : पक्षाच्या उमेदवारांचा मतदारांशी संवाद होता का? एखादा समुदाय पक्षापासून का दुरावला? पक्षनेत्यांच्या दौऱ्यांचा विविध समाजघटकांवर काही प्रभाव पडला का? अशा विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशात भाजप करत आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला यंदा मोठा फटका बसला. त्यामुळे केंद्रात स्वबळावर पक्षाला बहुमत मिळवता आले नाही.
उत्तर प्रदेशात भाजपला २०१९ मध्ये ६२ जागा मिळाल्या होत्या. तर ४९.९८ टक्के मते होती. मात्र २०२४ मध्ये थेट ३३ जागांवर घसरण झाली, मतेही ४१.३७ टक्के इतकी खाली आली. भाजपने आता पराभवावर मंथन सुरु केले आहे. पक्षाने विविध १६ बिंदू केंद्रीत करून त्यावर आधारीत प्रश्नावली तयार केली आहे. लखनऊ, वाराणसी वगळता अन्यत्र दारूण पराभव का झाला? ज्या जागा राखल्या तेथेही मताधिक्य घटले. याखेरीज मित्रपक्षांच्या कामगिरीचाही आढावा घेतला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी हा मतदारसंघ तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या लखनऊ मतदारसंघात मताधिक्य घटले. भाजपने उत्तर प्रदेशच्या कामगिरीचे मुल्यमापन करण्याची जबाबदारी ज्येष्ठ नेत्यांकडे सोपवली आहे. त्यांना संबंधित लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाला भेट देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. २५ जून पर्यंत प्रदेश नेतृत्त्वाला त्यांना अहवाल सादर करायचा आहे. त्यानंतर राज्य नेतृत्त्व केंद्रीय नेत्यांना हा अहवाल पाठवेल.
हेही वाचा >>>चार व्यक्तींकडून २३ वर्षीय युवकावर लैंगिक अत्याचार; पीडित युवकाची आत्महत्या
पक्षाकडून उपस्थित करण्यात आलेले प्रश्न
● मतदारसंघांत कार्यकर्ते किती सक्रीय होते.
● राज्य किंवा केंद्र सरकारच्या एखाद्या निर्णयाने फटका बसला का?
● धोरण आखणीत काय चूक झाली काय?
● हिंदूंची मते जातीत विभागण्याची कारणे कोणती?
● प्रसिद्धी साहित्य किती प्रभावाने वापरले.
● मतदान केंद्र व्यवस्थापन कसे होते?
पेपरफुटी तसेच बेरोजगारीचा मुद्दा महत्त्वाचा
राज्यातील कायदा व सुव्यवस्था चांगली आहे. परंतू विविध भरती परीक्षांमधील पेररफुटी तसेच बेरोजगारीचा मुद्दा चिंतेची बाब ठरल्याचे एका पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले. भाजप प्रदेशाध्यक्ष भुपेंद्र सिंह चौधरी हे अयोध्या दौरा करणार आहेत. तेथे भाजपचा पराभव झाला होता.
कार्यकर्त्यांशी संवाद
भाजप नेते हे कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतील. तसेच विरोधी उमेदवाराचा प्रचार त्याच्याकडे असलेले स्त्रोत याचाही विचार केला जाईल. विरोधकांची ज्या मुद्द्यावर प्रचार केला, त्याचा प्रभाव याचीही विचारणा होईल असे एका भाजप नेत्याने नमूद केले. पक्षाला २०२७ च्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे असल्याने असे सविस्तर विश्लेषण गरजेचे असल्याचे एका पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले.