scorecardresearch

“…तर राहुल गांधींच्या फोटोला चपलेनं बडवणार का?”, राम कदमांचा उद्धव ठाकरेंना सवाल

भाजपाचे प्रवक्ते राम कदम यांनीही उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे.

uddhav thackeray and rahul gandhi
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे. मोदी समुदायाच्या अवमानप्रकरणी त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी माफी मागण्याबद्दल विचारलं असता राहुल गांधी म्हणाले, “माफी मागायला मी सावरकर नाही, माझं नाव गांधी आहे, गांधी कुणाची माफी मागत नाही.” राहुल गांधींच्या या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मालेगाव येथील सभेतून राहुल गांधींना थेट इशारा दिला. वीर सावरकर हे आमचे दैवत आहेत. आम्ही त्यांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना दिला. यानंतर आता भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं जात आहे. तसेच सावरकरांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, असा सल्लाही दिला जात आहे.

दरम्यान, भाजपाचे प्रवक्ते राम कदम यांनीही उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे. मनीशंकर अय्यर यांनी जेव्हा वीर सावरकरांचा अपमान केला होता. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत:च्या हाताने मनीशंकर अय्यरच्या प्रतिमेला चपलेनं बडवलं होतं. त्यामुळे तुम्ही राहुल गांधींच्या प्रतिमेला चपलेनं मारणार आहात का? असा सवाल राम कदम यांनी विचारला. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा- “…की घरी बसून अंडी उबवणार?” सावरकरांच्या अपमानावरून राहुल गांधींना इशारा देणाऱ्या उद्धव ठाकरेंना मनसेचा टोला

उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना राम कदम म्हणाले, “सत्ता गेल्यानंतर ३ वर्षांनी आता उद्धव ठाकरेंचं वीर सावरकर प्रेम उफाळून आलं आहे. सत्तेच्या काळात राहुल गांधी दररोज सावरकरांबद्दल अपमानास्पद बोलत होते. त्या वेळेस आपण शांत का होतात? तुम्हाला कुणी आडवलं होतं का? तुम्ही तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होता. आता पुन्हा राहुल गांधी सावरकरांचा अपमान करत आहेत. तुम्ही म्हणता की, आम्ही सहन करणार नाही. जेव्हा मनीशंकर अय्यर यांनी वीर सावरकरांचा अपमान केला होता. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: मनीशंकर अय्यर यांच्या फोटोला चपलांनी बडवलं होतं. तसं तुम्हीही बडवणार आहात का?”

हेही वाचा- “५२ नव्हे तर १५२ कुळं खाली उतरली तरी…”, उद्धव ठाकरेंचं चंद्रशेखर बावनकुळेंवर टीकास्र!

“तुम्ही मालेगावच्या भाषणात जे काही बोलत होता, ती केवळ नौटंकी होती का? म्हणजे एकीकडे म्हणायचं की, आम्ही राहुल गांधींना सहन करणार नाही. दुसरीकडे त्याच राहुल गांधींच्या काँग्रेसबरोबर घरोबा करायचा. हा दुटप्पीपणा नाही का? तुम्हाला वीर सावरकरांबद्दल खरं प्रेम असेल, तर बाळासाहेब ठाकरेंनी जसं स्वतः च्या जोड्यांनी मनीशंकर अय्यरच्या फोटोला बडवलं होतं, तसं तुम्हीही बडवणार आहात का? हा महाराष्ट्राच्या जनतेचा सवाल आहे,” अशी टीका राम कदम यांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 14:45 IST

संबंधित बातम्या