India Pakistan Tension : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक कठोर निर्णय घेत ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अंतर्गत ‘एअर स्ट्राईक’ करत पाकिस्तानमधील ९ ठिकाणच्या दहशतवादी तळांना लक्ष्य करत जोरदार प्रत्युत्तर दिलं.

दरम्यान, अद्यापही पाकिस्तानची आगळीक सुरु असून पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने ड्रोन हल्ले करण्यात येत आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव आणखी वाढल्याची परिस्थिती समोर येत आहे. तसेच पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला भारताचं सैन्यही जोरदार प्रत्युत्तर देत आहे. आज शुक्रवारी (९ मे) रात्री पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलं होतं. यावेळी फिरोजपूरमध्ये सायरन आणि स्फोटांचे आवाज नागरिकांना आले.

तसेच यावेळी एक पाकिस्तानी ड्रोन फिरोजपूरमधील एका घरावर पडल्याने एकाच कुटुंबातील तिघेजण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने एक्सवरून (ट्विटर) दिलं आहे. तसेच या वृत्ताला फिरोजपूरचे एसएसपी भूपिंदर सिंग सिद्धू यांनी देखील दुजोरा दिला आहे. तसेच हे पाकिस्तानी ड्रोन एका घरावर आदळल्यामुळे आग लागली होती असं सांगितलं जात आहे. तसेच हे ड्रोन सैन्याने निष्क्रिय केल्याची माहिती देखील फिरोजपूरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

फिरोजपूरच्या एसएसपींनी काय म्हटलं?

पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यात जखमी झालेल्या कुटुंबाबद्दल फिरोजपूरचे एसएसपी भूपिंदर सिंग सिद्धू यांनी माहिती देताना म्हटलं की, “आम्हाला ३ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. ते यामध्ये त्यांना भाजलेल्या जखमा आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच ड्रोन सैन्याने निष्क्रिय केले आहेत”, असं भूपिंदर सिंग सिद्धू यांनी स्पष्ट केलं आहे.

डॉक्टरांनी काय म्हटलं?

पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यात जखमी झालेल्या एका कुटुंबाबाबत डॉ.कमल बागी यांनी म्हटलं की, “ड्रोन-बॉम्बमुळे तीन जण जखमी झाले. यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असून मोठ्या प्रमाणात ती भाजली आहे. तसेच इतर दोघांना कमी लागलं असून आम्ही ताबडतोब त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. ते तिघेही एकाच कुटुंबातील आहेत.”