उत्तर प्रदेशमध्ये एका रासायनिक कारखान्यात स्फोट झाल्याने तब्बल १२ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ४ जून रोजी घडली. याआधी हा आकडा ८ होता. मात्र उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या आणखी चार कामगारांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १२ वर पोहोचली. या स्फोटात जवळपास २० जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून शक्य ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा >> युक्रेन संघर्षांचा संबंध भारत-चीनशी जोडणे अयोग्य; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी युरोपला फटकारले

मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील हापूर जिल्ह्यातील एका रासायनिक कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाला. अचानक स्फोट झाल्यामुळे येथे मोठी खळबळ उडाली. हा स्फोट इतका भीषण होता की यामध्ये आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तर या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

हेही वाचा >> “आता परिस्थिती बदलली, काँग्रेस देशातून हद्दपार,” हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची घणाघाती टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले दु:ख

“उत्तर प्रदेशमधील हापूर जिल्ह्यामध्ये रासायनिक कारखान्या हृदय पिळवटून टाकणारा स्फोट झाला. या स्फोटामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती मी शोक्य व्यक्त करतो. या स्फोटामध्ये जखमी झालेल्यांवर उपचार करण्याचा उत्तर प्रदेश सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे,” असे पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे.

हेही वाचा >> मोठी बातमी! कोर्बेव्हॅक्स लसीला DCGIकडून हिरवा झेंडा, बुस्टर डोस म्हणून वापर करण्यास परवानगी

दरम्यान या स्फोटानंतर “या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल. तसेच कारखान्यात कोणत्या केमिकलचा स्फोट झाला याचा शोध फॉरेन्सिक टीमकडून घेतला जाईल,” अशी हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मेधा रुपम यांनी दिली.