लंडन : ‘‘भारतीय लोकशाहीच्या संरचनेवर क्रूर हल्ला होत आहे. देशातील संस्थांवर जोरदार हल्ला होत आहे,’’ असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी करून भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. राहुल गांधी सध्या ब्रिटन दौऱ्यावर असून, ‘इंडियन जर्नालिस्ट असोसिएशन’ने आयोजित केलेल्या ‘इंडिया इनसाईट्स’ कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी यावेळी नवी दिल्ली व मुंबईतील ‘बीबीसी’च्या कार्यालयांचे प्राप्तिकर विभागाने ‘सर्वेक्षण’ केल्याचा संदर्भ दिला. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कशी गळचेपी होत आहे, याचे हे बोलके उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात विरोधी स्वर उमटूच द्यायचा नाही, या भाजपच्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठीच आपल्याला ‘भारत जोडो यात्रा’ काढण्याची प्रेरणा मिळाली, असे ते म्हणाले.