केंद्रीय गृह मंत्रालयाने देशाच्या सीमेवरील पंजाब, पश्चिम बंगाल आणि आसाममधील सीमा सुरक्षा दलाचं (BSF) कार्यक्षेत्र १५ किलोमीटरवरुन ५० किलोमीटर करण्याचा निर्णय घेतला. यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी यावर टीका करत निर्णयाला विरोध केलाय. या वादानंतर आता सीमा सुरक्षा दलाने या निर्णयाबाबत स्पष्टीकरण दिलंय. या निर्णयाने बीएसएफच्या कार्यक्षेत्रात एकसारखेपणा येईल आणि सीमेवरील गुन्हे कमी करण्यास मदत होईल, असं भूमिका बीएसएफने मांडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीएसएफने म्हटलं, “सीमारेषांचा निर्णय बीएसएफच्या कार्यक्षेत्रात एकसारखेपणा आणण्यासाठी घेण्यात आलाय. या दुरुस्तीमुळे पंजाब, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान आणि आसाम या राज्यांमध्ये बीएसएफला सीमेवरील गुन्हे कमी करण्यासाठी मदत होईल. या राज्यांमध्ये आता बीएसएफला ५० किलोमीटरच्या परिसरात काम करता येईल.”

नव्या निर्णयाने काय बदल होणार?

केंद्र सरकारने या निर्णयासह या राज्यांमधील बीएसएफचे अधिकार वाढवले आहेत. त्यामुळे बीएसएफला सीमेवरील मोठ्या भूभागावर शोधमोहिम, छापेमारी, अटक, जप्ती अशा कारवाई करणं शक्य होणार आहे. देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून ५० किलोमीटरवर आता बीएसएफचं नियंत्रण असणार आहे. याआधी बीएसएफला केवळ १५ किलोमीटर परिसरातच कारवाईचे अधिकार होते.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून निर्णयाला विरोध

या नव्या आदेशावर मुख्यमंत्री चन्नी यांनी ट्विट करून केंद्राच्या या निर्णयाला विरोध केला आहे. “आंतरराष्ट्रीय सीमेवर चालणाऱ्या ५० किमीच्या परिघात बीएसएफला अतिरिक्त अधिकार देण्याच्या भारत सरकारच्या एकतर्फी निर्णयाचा मी तीव्र निषेध करतो. हा संघराज्यावर थेट हल्ला आहे. हा निर्णय तातडीने मागे घ्यावा,” अशी मागणी मुख्यमंत्री चन्नी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.

“मोदींना विनंती करतो की राज्यातील शांतता भंग करू नका”

“आम्ही या निर्णयाचा निषेध करतो. हे संघीय संरचनेचे उल्लंघन आहे आणि पंजाबमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करेल. लोक हे सहन करणार नाहीत. पंजाबने कधीही सांप्रदायिक हिंसा पाहिली नाही. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो की राज्यातील शांतता भंग करू नका,” असे पंजाबचे गृहमंत्री सुखजिंदर रंधावा म्हणाले.

“पंजाबच्या ५०००० चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी २५००० चौरस किमी क्षेत्र बीएसएफच्या अखत्यारीत”

यावरुन पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांनी ट्विटरवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी त्यांच्याच पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना प्रश्न विचारला आहे. “तुम्ही काय मागता याची काळजी घ्या! चरणजीत सिंह चन्नी यांनी अनवधानाने अर्धा पंजाब केंद्राकडे सोपवला आहे का? आता पंजाबच्या ५०००० चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी सुमारे २५००० चौरस किमी क्षेत्र बीएसएफच्या अखत्यारीत येईल. पंजाब पोलीस फक्त उभे राहतील. आम्हाला अजूनही राज्यांना अधिक स्वायत्तता हवी आहे, ”असे जाखड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा : भारत-बांगलादेश सीमेवर चीनी गुप्तहेराला अटक; BSF ची कारवाई

अमरिंदर सिंगांकडून केंद्राच्या निर्णयाचे स्वागत

त्याचबरोबर पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसवर नाराज असलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. “काश्मीरमध्ये आमचे सैनिक मारले जात आहेत. पाकिस्तान समर्थित अतिरेक्यांकडून पंजाबमध्ये अधिकाधिक शस्त्रे आणि अंमली पदार्थ पाठवले जात असल्याचे आपण पाहत आहोत. बीएसफची वाढलेली उपस्थिती आणि ताकद आपल्याला आणखी मजबूत करेल. केंद्रीय सशस्त्र दलांना राजकारणात ओढू नका,” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bsf clear stand on decision of change in border jurisdiction up to 50 km pbs
First published on: 14-10-2021 at 12:28 IST