कांद्याच्या वाढत्या भाववाढ नियंत्रणात आणण्यात केंद्र सरकारला अपयश आले असून यावरून सरकारकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप करत केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याविरुद्ध एका व्यक्तीनं तक्रार दाखल केली आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील कोर्टात राजू नय्यर यांनी न्यायधंडाधिकाऱ्यांकडे पासवानांविरोधात फौजदारी तक्रार केली आहे. या तक्रारीवर १२ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

मिठनपुरात राहणारे राजू नय्यर यांनी अॅड. मनोजकुमार सिंग यांच्यामार्फत तक्रार केली आहे. या तक्रारीच्या आधारे भारतीय दंड विधान कलम ४२० (फसवणूक), ५०६ (धमकावणे), ३७९ (चोरी) अन्वये पासवनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका वृत्तवाहिनीवर कांद्याच्या वाढत्या महागीवर पासवान यांनी केलेला दावा ग्राह्य नसल्याचे हेरत नय्यर थेट कोर्टात पोहचलेत. ‘कांद्याचा काळा बाजार होत असल्याने कांद्याचा तुटवडा भासत असल्याचा दावा पासवान यांनी केला होता.’ पासवान यांचा हा दावा म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. कांद्याचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले असताना सरकार त्यावर तातडीने उपाययोजना न करता जनतेची फसवणूक करत आहे, असा आरोप नय्यर यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

यंदा कांद्याने सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यातून पाणी आणलं आहे. देशाच्या विविध भागांत किरकोळ बाजारात कांद्याचा भाव प्रतिकिलोमागे सव्वाशे ते दीडशे रुपयांपर्यंत पोहचला आहे. महाराष्टातील सोलापूरात आणि बंगळुरूमध्ये शनिवारी कांदा २०० रूपये प्रतिकिलोपर्यंत पोहचला आहे. कांदा निर्यातीवर बंदी घालताना कांद्याची आयात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली असतानाही अद्याप कांद्याचे भाव नियंत्रणात न आल्यामुळे सर्वसामान्यांच्या जेवणातून कांदा गायब आहे.