Operation Sindoor Airport Update : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबल्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, या ड्रोन हल्ल्याला भारतीय लष्कर जशास तसं प्रत्युत्तर देत आहे. शुक्रवारी रात्री (९ मे) पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवरील जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला ते गुजरातमधील भुजपर्यंत तब्बल २६ ठिकाणी ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण हा प्रयत्न भारतीय जवानांनी हानून पाडला.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता ३२ भारतीय विमानतळावरील नागरी उड्डाणे १५ मेपर्यंत बंद राहणार आहेत. नियमित उड्डाणांसाठी ही विमानतळे बंद करण्यात आल्यामुळे दररोज तब्बल ४०० पेक्षा जास्त उड्डाणे रद्द होणार आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या कारवाईनंतर संभाव्य धोका पाहता भारत सरकार अलर्ट मोडवर आहे. ३२ भारतीय विमानतळावरील नागरी उड्डाणे बंद करण्यात आल्याच्या विमानतळामध्ये काही सीमावर्ती भागातील विमानतळांचा समावेश आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे.

कोणते विमानतळ बंद राहतील?

उत्तर आणि पश्चिम भारतातील भारतीय लष्करी छावण्यासह नागरी वस्तीवर देखील पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे विमानतळांवरील उड्डाणे १५ मेपर्यंत बंद करण्यात आले आहेत. यापैकी बहुतेक विमानतळांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा देखील तैनात करण्यात आलेली आहे. यामध्ये श्रीनगर, जम्मू, लेह, अमृतसर, चंदीगड, अंबाला, लुधियाना, जोधपूर, बिकानेर, जैसलमेर, उत्तरलाई, राजकोट, भुज, जामनगर, धर्मशाला, बठिंडा, पटियाला, पठाणकोट, शिमला, किशनगड, हिंडन, पोरबंदर, मुंद्रा आणि कांडला येथील विमानतळांचा समावेश आहे.

दरम्यान, या कालावधीत या विमानतळांवरील सर्व नागरी उड्डाणे स्थगित राहतील. तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) दिल्ली आणि मुंबई उड्डाण माहिती क्षेत्रांमध्ये (FIR) हवाई वाहतूक सेवा (ATS) मार्गांच्या २५ विभागांच्या तात्पुरत्या बंदीचा कालावधीही वाढवला असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने शुक्रवारी उशिरा दिलेल्या निवेदनात म्हटलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.