केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांचा आणि किमान आधारभूक किंमतच्या (एमएसपी) मागणीला शेतकरी संघटनांनी निदर्शने करून जवळपास एक वर्ष झाले आहे. दिल्लीच्या सीमेवर तसेच पंजाब आणि हरियाणामध्ये अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत. दरम्यान, मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ विधान केले आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केंद्र सरकारने एमएसपी हमी देण्यासाठी कायदा करावा असे म्हटले आहे.

जर सरकारने कायदा करून एमएसपीची हमी दिली तर हा संपूर्ण प्रश्न सुटू शकतो. आंदोलन करणारे शेतकरी एमएसपी हमी कायद्याशिवाय या प्रकरणावर तोडगा काढणार नाहीत. शेतकऱ्यांना फक्त हेच हवे आहे असे सत्यपाल मलिक म्हणाले.

एमएसपी कायदा लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांचा प्रश्न नक्कीच सुटेल असा विश्वासही मलिक यांनी व्यक्त केला आहे. जर केंद्र सरकार कायद्याद्वारे एमएसपी हमी प्रदान करत असेल तर तीन शेतकरी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सोडवले जाऊ शकते फक्त एकच गोष्ट आहे मग तुम्ही (केंद्र) ती का पूर्ण करत नाही? ते (शेतकरी) एमएसपीच्या कमी किंमतीसोबत तडजोड करणार नाहीत,” असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. १० महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. आता पेरणीची वेळ आली आहे, पण शेतकरी आंदोलन करत आहेत. जर गरज पडली तर मी शेतकऱ्यांसाठी राज्यपाल पदही सोडेल, असे रविवारी झुंझुनू यात्रेदरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना मलिक यांनी म्हटले आहे.

“मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारशी लढाई सुद्धा लढली आहे. एमएसपीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांची सुनावणी झाली पाहिजे. जेव्हा एमएसपी लागू होईल तेव्हा शेतकऱ्यांचे आंदोलन आपोआप संपेल. बऱ्याच काळापासून शेतकऱ्यांवर अत्याचार सुरू आहेत. जर शेतकऱ्यांचे ऐकले नाही तर ते कठीण होईल,” असे मलिक यांनी म्हटले आहे.

मध्यस्थी करण्यासाठी तयार- मलिक

जर मला विचारले गेले तर मी शेतकरी आंदोलन संपवण्यासाठी मध्यस्थी करू शकतो. तीनही कृषी कायदे प्रलंबित सोडले पाहिजेत असे मलिक म्हणाले. लखीमपूर खेरी प्रकरणाचा उल्लेख करताना मलिक म्हणाले की, आतापर्यंत केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही हे चुकीचे आहे. त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना लक्ष्य करत अनेक टीका केल्या. या प्रकरणाची योग्य चौकशी झाली पाहिजे. पूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा संदर्भ देत ते म्हणाले की, मी जम्मू -काश्मीरचा राज्यपाल असताना तेथील दहशतवादी हल्ले बऱ्याच प्रमाणात कमी झाले होते. दहशतवादी कित्येक किलोमीटरपर्यंत आत येऊ शकले नाहीत. आता श्रीनगर शहरात येऊन दहशतवादी गरीबांना लक्ष्य करत आहेत, असेही मलिक म्हणाले.