नवी दिल्ली : महान क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक शहीद भगतसिंग यांचे नाव चंडीगड विमानतळाला देण्यात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मोदींच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. या वेळी ते म्हणाले, की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातील महत्त्वाचा दिवस लवकरच येत आहे. २८ सप्टेंबर रोजी शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी होणार आहे. त्या दिवशी ‘अमृत महोत्सव’चा महत्त्वाचा दिवस येत आहे. या जयंतीदिनापूर्वी या महान क्रांतिकारकाला अभिवादन म्हणून, चंडीगड विमानतळाला त्यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, या संवादात भाजपचे नेते आणि विचारवंत दीनदयाळ उपाध्याय यांना श्रद्धांजली वाहताना मोदी म्हणाले, की ते एक प्रगल्भ विचारवंत आणि देशाचे महान पुत्र होते. चित्त्यांच्या भारतातील आगमनावर बोलताना त्यांनी सांगितले, की चित्त्यांचे आगमन १३० कोटी भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. एक कृतिदल चित्त्यांवर लक्ष ठेवेल. त्यांच्या अभ्यासांती देशातील सामान्य नागरिक चित्ते कधी पाहू शकतील, हे ठरवले जाईल.