भाजपा देशात द्वेष पसरवत आहे. त्यामुळे परदेशी सैन्यानी भारतीय जमिनीवर आक्रमण केले आहे. द्वेष पसवणाऱ्या आणि समाजात फूट पाडणाऱ्यांना विसरले जाईल, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ‘भारत जोडो यात्रे’च्या निमित्ताने केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्याच्या राहुल गांधी यांनी जनतेला संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले, “भारतात काय चाललं आहे, हे बाहेरचे विरोधक पाहत आहेत. देश दुभंगलेला, द्वेषाने भरलेला आणि नेतृत्वाचा अहंकार स्पष्टपणे विरोधकांना दिसत आहे. चीनने आपल्या हजारो किलोमीटर जमिनीवर चीनने ताबा घेतल्याचं सैन्यानं मान्य केलं आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फेटाळून लावत आहे. चीनने दिल्लीएवढ्या भारतीय जमिनीवर ताबा घेतला आहे.”

हेही वाचा – ‘भारत जोडो यात्रे’वरून प्रशांत किशोरांचा काँग्रेसला सल्ला; म्हणाले, “भाजपा शासित राज्यातून…”

“देशाचे नेतृत्व करणाऱ्यांच्या भाषणात आपुलकी, प्रेम…”

“देशात बेरोजगारी, महागाईसह अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. देशात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटना श्री नारायण गुरु, चटंबी स्वामीकल आणि महात्मा अय्यंकली यांसारख्या समाजसुधारकांनी मान्य केल्या असत्या का? देशाचे नेतृत्व करणाऱ्यांची भाषणे द्वेष आणि अहंकाराने भरलेली असतात. एकाही भाषणात आपुलकी, प्रेम आणि नम्रता आपल्याला आढळणार नाही,” असा टोला राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे.