दोन दिवसांपूर्वी बिहार पोलिसांनी चिनी गुप्तहेर महिलेला अटक केली होती. ही महिला तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांची हेरगिरी करत असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत महिलेला अटक केली. अशात दलाई लामा यांनी चीनवर मोठा आरोप केला आहे. चीन बौद्ध धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. पण, ते यशस्वी होणार नाही, असं दलाई लामा यांनी म्हटलं. बिहारमधील बोधगया येथे दलाई लामा बोलत होते. "चीन बौद्ध धर्माला विषारी समजत आहे. धर्म नष्ट करण्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे. बौद्ध धर्माचं विहार तोडण्यात आलं. तरीही बौद्ध धर्म आपल्या जागी उभा आहे. बौद्ध धर्माला नुकसान पोहचवलं, तरी सुद्धा चीनमधील लोकांची आस्था कमी झाली नाही," असं दलाई लामा यांनी सांगितलं. हेही वाचा : “केंद्र सरकार लष्कराच्या मागे लपत…”, चिनी घुसखोरीवरून राहुल गांधींचं टीकास्त्र; म्हणाले… परमाणू बॉम्बपेक्षा करोना भयंकर दलाई लामा म्हणाले की, "करोना संसर्ग परमाणू बॉम्बपेक्षा अधिक खतरनाक आहे. परमाणू बॉम्ब आणि करोना संसर्गासारख्या महामारीपासून जगाला मुक्त केलं पाहिजं. परमाणू बॉम्बचा हल्ला अतिशय वेदनादायक असतो. त्यामुळे परमाणू हल्ल्याच्या भीतीखाली किती दिवस जगायचं," असा सवाल दलाई लामा यांनी उपस्थित केला आहे.