अलीकडच्या काळात चीनी कंपन्यांनी भारतातील महामार्ग प्रकल्पांमध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नाही, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. भारत आणि चीनच्या सीमेवरवरील परिस्थिती पाहता भारत चीनी कंपन्यांना संयुक्त उपक्रमांसह महामार्ग प्रकल्पांमध्ये सहभागी होऊ देणार नाही, असं गडकरी जुलै २०२० मध्ये म्हणाले होते. त्यानंतर कोणत्याचं चीनी कंपनीने भारतातील महामार्ग प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केलेली नाही. गेल्या वर्षी जुन महिन्यात भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झटापट झाली होती. त्यामध्ये २० भारतीय जवानांना वीरमरण आलं होतं, त्यानंतर गडकरी यांनी चीनी कंपन्यांना महामार्ग प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करू देणार नाही, असं स्पष्ट केलं होतं.   

येत्या काळात भारताला आपली निर्यात वाढवावी लागेल आणि आयात कमी करावी लागेल. तरच देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होईल, असंही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी म्हणाले. पीटीआयला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत गडकरी इतरही विषयांवर बोलले आहेत. वाहनांवरील आयात शुल्कासंबंधीत प्रश्नाला उत्तर देताना अमेरिकेतील इलेक्ट्रिक कार टेस्लाच्या भारतातील इलेक्ट्रिक वाहनांवरील (ईव्ही) आयात शुल्क कमी करण्याच्या मागणीबद्दलचा निर्णय हा अर्थ मंत्रालय घेईल, असं नितीन गडकरी म्हणाले.

दरम्यान, नितीन गडकरी हे त्यांच्या कामामुळे चांगलेच लोकप्रिय आहेत. काही दिवसांपूर्वी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या या इमर्जन्सी लँडिंग फील्ड (ईएलएफ)चे उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय हवाई दलाला सशस्त्र दलाच्या विमानांसाठी इमर्जन्सी लँडिंग फील्ड दीड वर्षांऐवजी केवळ १५ दिवसांमध्ये तयार करून दिल्या जातील, असे वचन दिले होते.