नवी दिल्ली : ‘भारत जोडो’ यात्रेतील काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या विधानावरून राज्यसभेत मंगळवारी शून्य प्रहरात रणकंदन माजले. खरगेंनी सभागृहाचा, देशाचा, मतदारांचा अपमान केला असून त्यांनी तातडीने माफी मागितली पाहिजे, अशी जोरदार मागणी करत सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी काँग्रेसवर शाब्दिक हल्लाबोल केला. यावर ‘स्वातंत्र्यलढय़ात माफी मागणारे आम्हाला माफी मागायला सांगत आहेत’, असे तितकेच आक्रमक प्रत्युत्तर खरगेंनी दिले. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या सदस्यांमध्ये बाचाबाची झाली. लोकसभेत याच मुद्दय़ावरून विरोधकांनी सभात्याग केला. राजस्थानमध्ये ‘भारत जोडो’ यात्रेत सोमवारी अलवार येथील जाहीरसभेत खरगेंनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपवर कडाडून टीका केली. स्वातंत्र्यलढय़ात संघाचा सहभाग नव्हता. त्यांच्यापैकी कोणीही या लढय़ात बलिदान दिले नाही. त्यांच्या घरातील कुत्र्याने तरी देशासाठी प्राण गमावले होते का? तरीही, संघ-भाजप स्वत:ला राष्ट्रप्रेमी म्हणवून घेत आहे. पण, आम्ही (काँग्रेस) त्यांच्यावर टीका केली तर आम्हाला देशद्रोही ठरवले जाते, असे खरगे म्हणाले होते. या विधानांवर राज्यसभेतील गटनेते पीयुष गोयल यांनी आक्षेप घेतला. ‘खरगेंचे विधान अत्यंत आक्षेपार्ह असून त्यांनी माफी मागितली पाहिजे. काँग्रेसच्या पक्षाध्यक्षांना जाहीर सभेत कसे बोलावे हेदेखील कळत नाही. एखाद्या मुद्दय़ावर मतभेद असू शकतात. पण, हे विधान म्हणजे भाजपच्या यशाबद्दल काँग्रेसची असूया दर्शवते. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जेमतेम ५० जागा मिळाल्या, भाजपला ३०३ जागांचे प्रचंड बहुमत मिळाले. काँग्रेसला आता कोणी वाली नाही. महात्मा गांधींनी काँग्रेसचे विसर्जन करण्याची सूचना केली होती. त्यांची ही सूचना किती योग्य होती हे खरगेंवरून दिसते. खरगेंनी माफी मागावी अन्यथा विरोधी पक्षपदावर राहू नये, असे गोयल म्हणाले. त्यानंतर दोन्ही बाजूंकडील सदस्यांनी जबरदस्त गदारोळ केला. गोयल यांच्या विधानावर खरगेंनी आणखी आक्रमक होत सत्तधारी पक्षाच्या सदस्यांना प्रत्युत्तर दिले. ‘मी भाषणात बोललो, तेच पुन्हा सभागृहात बोललो तर तुमची फारच पंचाईत होईल. स्वातंत्र्यलढय़ाच्या काळात तुम्ही माफी मागितली. तुम्ही स्वातंत्र्यलढय़ात कधीही नव्हता. आता तुम्ही मला माफी मागायला सांगत आहात. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी प्राण गमावले. तुमच्यापैकी कोणी देशासाठी बलिदान दिले? देशाला एकत्र ठेवण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले. तुम्ही काय केले?’, अशी प्रश्नांची सरबत्ती खरगेंनी केली. सभागृहाबाहेर केलेल्या विधानावर इथे चर्चा होऊ शकत नाही, असे स्पष्ट करत खरगेंनी भाजपची माफीची मागणी धुडकावून लावली. खरगेंचा मुद्दा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी मान्य केला. तरीही, पीयुष गोयल यांनी, काँग्रेसच्या धोरणांमुळे देशाचे नुकसान झाल्याचा मुद्दा रेटला. या सगळय़ा गोंधळात चीनच्या मुद्दय़ावर मंगळवारी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी दिलेल्या ६ नोटिसा धनखड यांनी फेटाळल्या. समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यांनी दिलेली नोटीस फेटाळताना धनखड म्हणाले की, सभागृहात चर्चा घेण्यासाठी कोणा मंत्र्यांच्या परवानगीची गरज नाही. या सभागृहात मीच निर्णय घेतो. अधिवेशन शुक्रवारी गुंडाळणार संसदेचे हिवाळी अधिवेशन एक आठवडा आधीच म्हणजे शुक्रवारी २३ डिसेंबर रोजी गुंडाळले जाणार आहे. लोकसभेच्या संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला. अधिवेशन ९ डिसेंबपर्यंत चालवले जाणार होते. मात्र, नाताळच्या सुट्टय़ा असल्याने ६ दिवस आधीच कामकाज संस्थगित केले जाणार आहे. नड्डांना मुदतवाढ? भाजपच्या पक्षाध्यक्ष पदाची जे. पी. नड्डा यांची तीन वर्षांची मुदत पुढील महिन्यामध्ये संपुष्टात येत असली तरी, त्यांना मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक होईपर्यंत भाजपच्या पक्षांतर्गत निवडणुकाही स्थगित केल्या जातील. नड्डांच्या मुदतवाढीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकही घेतली जाणार आहे. यापूर्वी अमित शहा यांनाही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती.