मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) क्लीनचीट दिली असून, यामुळे त्यांचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग सुकर झाला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएकडून शुक्रवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे नाव नाही. त्यांच्यासह एकूण सहा जणांविरुद्ध सबळ पुरावे सापडले नसल्याचे एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे. या प्रकरणात एकूण दहा जणांवर आरोपपत्र सादर करण्यात आले. त्यामध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे प्रसाद पुरोहित यांच्यासह अन्य सर्व आरोपींवरील मोक्काही एनआयएकडून काढून टाकण्यात आला आहे. बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंडविधान संहितेतील इतर कलमांच्या आधारे आरोप ठेवण्यात आले आहेत.


महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख आणि २६/११ हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांनी या प्रकरणी केलेल्या तपासानंतर कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह अन्य काही आरोपींवर आरोपपत्र दाखल केले होते. पण एनआयएने दहा जणांविरोधात आरोपपत्र देऊन उर्वरित आरोपींना सबळ पुराव्यांभावी क्लीन चीट दिली आहे.