राज्यात ईडीसह केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या धाडसत्रावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकावर जोरदार टीका केली आहे. मंत्र्यांवर आणि सरकारवर होत असलेल्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रत्युत्तर दिलं. विधानसभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिकांवर केलेल्या कारवाईवरुन पाकिस्तानात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख न करता थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. केंद्राच्या यंत्रणाचे काम थाळ्या वाजवायचंआहे का? "एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं की, केंद्रीय तपास यंत्रणा एवढ्या पोकळ झाल्या आहेत की, नवाब मलिक हा दाऊदचा हस्तक संपूर्ण मुंबई आणि देशात सगळीकडे फिरतोय आणि चार-पाच वेळा निवडून येतोय. मंत्री बनतोय आणि केंद्रातील यंत्रणांना माहितीच नाही. केंद्राच्या यंत्रणा मग करतायंत काय? नुसतं थाळ्या वाजवायचं, दिवे पेटवायचं काम करायचं का? दिवे लावतात, तर दिव्याच्या प्रकाशात तरी बघा ना कोणती माणसं दाऊदची आहेत. देवेंद्र फडणवीसांना केंद्राने रॉ, सीबीआयमध्ये घ्यायला पाहिजे म्हणजे काम अधिक वेगाने होईल. कारण ती माहिती तुम्ही ईडीकडे दिली. त्यामुळे काम आणखी वेगाने होईल. माहिती देणारे, आरोप करणारे, चौकशी करणारे सर्व तुम्हीच आहात. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे पण सगळ्या यंत्रणा अशा राबवणार म्हणजे ती ईडी आहे का घरगडी आहे हेच कळत नाहीये", असा सवाल उपस्थित करत ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला. “तुमचा सकाळचा प्रयोग यशस्वी झाला असता तर अनिल देशमुख…”; मुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला दाऊद कुठेय कुणाला माहितीये का? "मी अधिवेशनात अधूनमधून येत होतो. पूर्वी एक दाऊद शूज होते. तेही घोटाळ्यात गेला. पण त्याची एजन्सी कुणी घेतलीये का? हा दाऊद आहे कुठे? एखादा विषय निवडणुकीसाठी कितीकाळ घेणार आहात. इतकी वर्ष राम मंदिराचा विषय घेतला, आता यापुढे दाऊदचा घेणार आहात का? आधी रामाच्या नावाने मतं मागितली आता दाऊदच्या नावाने मागणार आहात का? हा दाऊद कुठेय कुणाला माहितीये का?", असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. “केंद्रात सरकार मिळालं तरी काही जणांचा जीव मुंबईत आहे”; मुख्यमंत्र्यांची भाजपावर जोरदार टीका ओबामांनी ओसामाच्या नावाने मतं मागितली होती का? "गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी सांगितलं होत की, दाऊदला फरफटत आणू. आता त्याच्यामागे फरफटत चाललो आहोत. त्याचे हस्तक शोधतोय. ओबामांनी ओसामाच्या नावाने मतं मागितली होती का? ओबामांनी निवडणुकीत त्याचा वापर केला होता. ओबामांनी कुणाची वाट नाही बघितली. पाकिस्तान ढगाआडून हेलिकॉप्टर पाठवायचे असा थिल्लरपणा नाही केला. त्यांनी जवान पाठवले आणि लादेनला घरात घुसून मारलं. याला म्हणतात मर्दपणा. जसं ओबामांनी ओसामाला मारलं, तर तुम्ही दाऊदला मारा. काहीही न करता नुसतं, आरोप करता. मी प्रामाणिकपणे सांगतोय की, आम्ही देशद्रोह्यांच्या विरोधात आहोत. त्याबद्दल दुमत नाही. मलिकांचा राजीनामा मागत आहात. अफजल गुरूला फाशीला मेहबुबा मुफ्तींनी विरोध केला. त्यांच्यासोबत तुम्ही सत्ता स्थापन केली", असंही मुख्यमंत्री यांनी म्हटले.