हिवाळ्याच्या मोसमात पावसाने हजेरी लावल्याने थंडी पडण्यास उशिर झाला. मात्र गेल्या काही दिवसात तापमनात घट होत असल्याचं दिसत आहे. मागच्या दोन आठवड्यात महाराष्ट्रासह अनेक राज्यात थंडी जाणवू लागली आहे. उत्तर भारतात तर पारा घसरला आहे. उत्तर भारतातील राज्यांच्या अनेक भागांमध्ये तापमानात घट झाली आहे कारण या भागांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवला आहे. १८ डिसेंबरपासून चंदीगड आणि उत्तर राजस्थानमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आयएमडीने दिली आहे.

पंजाबमध्ये २० डिसेंबरपर्यंत आणि हरियाणा, चंदीगढ आणि उत्तर राजस्थानमध्ये १८ ते २० डिसेंबर २०२१ पर्यंत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. पुढील २-३ दिवसांत किमान तापमान २-३ अंशाने घसरण्याची शक्यता आहे. तर पुढील तीन दिवस म्हणजेत जम्मू, काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशात आणि उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस किंवा हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत बुधवारी किमान तापमान ७.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तापमान सामान्यपेक्षा एक अंश कमी होते. सकाळी ९ वाजता हवेचा दर्जा निर्देशांक ३६६ होता. कमाल तापमान २३ अंश सेल्सिअसवर स्थिरावण्याची शक्यता आहे. १२ डिसेंबर रोजी दिल्लीमध्ये या हंगामातील किमान तापमान ६.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. राष्ट्रीय राजधानीतील आतापर्यंतच्या हंगामातील सर्वात कमी तापमान आहे, असे भारताच्या हवामान विभागाने सांगितले.