भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीच्या पक्षांना लक्ष्य केले. त्रिपुरातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्याची परिस्थिती पाहता डावे जगातून आणि काँग्रेस भारतातून हद्दपार झाल्याची बोचरी टीका त्यांनी यावेळी केली. डावे आणि काँग्रेस दोघेही आमचे प्रतिस्पर्धी आहेत. मात्र, त्रिपुरातील आगामी निवडणुकीत आमचीच सत्ता येईल, असा विश्वास यावेळी अमित शहा यांनी व्यक्त केला.

अमित शहा सध्या त्रिपुराच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. डाव्यांचे प्राबल्य असणाऱ्या त्रिपुरात सत्ता काबीज करण्यासाठी अमित शहा यांनी आज याठिकाणी ‘परिवर्तन यात्रे’चा शुभारंभ केला. यापूर्वी अमित शहा यांनी २७ एप्रिल २०१५ रोजी त्रिपुराला भेट दिली होती. त्रिपुरात १९९३ पासून डाव्यांची सत्ता आहे. या पार्श्वभूमीवर त्रिपुरातील जनतेला आवाहन करताना अमित शहा यांनी म्हटले की, देशाच्या अन्य भागातील अनेक निवडणुकांमध्ये जनतेने मोदींच्या नेतृत्त्वावर विश्वास दाखवला आहे. आतापर्यंतच्या निवडणुकांचे निकाल पाहता नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत, असे म्हणावे लागेल. भाजपने गेल्या काळात जिंकलेल्या विविध निवडणुकांवरून पक्षाला असणारा पाठिंबा लक्षात येतो, असे अमित शहा यांनी सांगितले. त्रिपुरात काही दिवसांपूर्वीच भाजप आणि सत्ताधारी डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला होता.

यावेळी अमित शहा यांनी त्रिपुरातही विकास हाच आमच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा राहील, हे स्पष्ट केले. याशिवाय, भाजप विरोधकांच्याबाबतीत ‘फोडा आणि खच्चीकरण करा’ ही रणनीती अवलंबणार असल्याचेही  शहा यांनी स्पष्ट केले. तसेच ईशान्य भारतात पक्षाचा विस्तार करण्याच्यादृष्टीने आणि डाव्यांशी असलेल्या वैचारिक लढाईमुळे त्रिपुराची निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचेही शहा यांनी सांगितले.