संसदेमध्ये समान प्रतिनिधित्व असावे, असा आग्रह धरून द्रमुकचे नेते एम. करुणानिधी नव्या वादाला तोंड फोडत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. याचा परिणाम केंद्रातील सरकार अस्थिर होण्यावर होईल, असेही काँग्रेसने म्हटले आहे.
अशा प्रकारचा प्रस्ताव वरकरणी योग्य दिसत असला, तरी भारत हा बहुढंगी देश असल्याने तो देशात योग्य ठरणार नाही, असे काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एस. आर. बालसुब्रह्मण्यम यांनी म्हटले आहे.
देशाचे ऐक्य, एकात्मता आणि सार्वभौमत्व यांना धक्का पोहोचणार नाही, अशा पद्धतीने भारतीय घटनेची अंमलबजावणी केली जाते. त्याच धर्तीवर निवडणुका घेतल्या जातात, असेही ते म्हणाले.
समाजाच्या सर्व स्तरातील घटकांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे अशी भूमिका असली, तरी समान प्रतिनिधित्वानुसार सर्वासाठी प्रतिनिधित्व मिळेल याची हमी नाही. काही मतदारसंघांत मतदारांची संख्या एक लाखाहून कमी आहे. त्यामुळे काही राज्यांना प्रतिनिधित्वच मिळणार नाही, अशी स्थितीही यऊ शकते, असेही ते म्हणाले.
अलीकडेच झालेल्या निवडणुकीत मतांची टक्केवारी गृहीत धरली, तर भाजपला (३१ टक्के) केवळ १८० जागाच मिळतात. कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही आणि त्यामुळे बहुपक्षीय सत्ता येईल आणि हा नियम अस्थिर असेल, असेही ते म्हणाले.