‘विधानसभेची जागा न दिल्यास प्रचार नाही’

पालघर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने महाआघाडी करून जागी बहुजन विकास आघाडीला सोडली असली तरी स्थानिक काँग्रेसचे नेते मात्र नाराज आहेत. जो पर्यंत आम्हाला ठोस आश्सासने मिळत नाही, तो पर्यंत प्रचार करणार नाही अशी भूमिका स्थानिक कॉंग्रेसने घेतली आहे.

दोन्ही काँग्रेसने राज्यात महाआघाडीकरून स्थानिक पक्षांना सोबत घेतले आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यानी पालघरची जागा महाआघाडीतील घटक बहुजन विकास आघाडीला सोडली आहे. मात्र स्थानिक नेत्यांनां विश्वासात न घेतल्याने ते नाराज होते. नंतर मनोर येथे महाआघाडीची बैठक झाली तेव्हा देखील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना विचारले नाही. त्यामुळे नाराजीत भर पडली आहे. बहुजन विकास आघाडीला जागा सोडली तरी विधानसभा, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत बविआने सहकार्य करायला हवे अशी स्थानिक कॉंग्रेसची भूमिका आहे. परंतु आश्वासन न मिळाल्याने काम न करण्याचा निर्णय जिल्ह्यातील कॉंग्रेसने घेतला आहे.

‘तरच आघाडीला अर्थ’

याबाबत बोलताना प्रदेश कॉंग्रेसचे सचिव विजय पाटील यांनी सांगितले की, विधानसभेची वसईची जागा, आगामी महापालिका निवडणुकीत सन्मानकारक जागा तसेच जिल्हा परिषदेत जागा ‘बविआ’ने आम्हाला द्यायला हवी, तरच या आघाडीला अर्थ आहे. ते आश्वासन अद्यापही मिळालेले नाही आणि  ते मिळत नाही, तोवर आम्ही प्रचार करणार नाही असे त्यांनी सांगितले.