भारताचे होऊ घातलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना निमंत्रण देण्यावरून काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे.
देशात घडणाऱया दहशतवादी कृत्यांना कारणीभूत असलेल्या शेजारी देशासोबत हातमिळवणीच्या चर्चा होऊच शकत नाही अशी भूमिका ठेवणाऱया भाजपने आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांना निमंत्रण दिल्यामुळे भाजपने आपल्या भूमिकेतील दुटप्पीपणा दाखवून दिला असल्याची टीका काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केली आहे.
नव्या पंतप्रधानांच्या शपथविधी कार्यक्रमासाठी कोणाला बोलवावे आणि कोणाला नाही याचे संपूर्ण अधिकार नव्या सरकारकडे आहेत. हे मान्य असले तरी, भारतीय सीमेवर होणाऱया शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा प्रश्न चर्चेने सोडवू पाहणाऱया माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्यावर भाजपने टीकास्त्र केले होते. याचीही आठवण भाजपला असावी असेही मनिष तिवारी म्हणालेत.
भारतीय सीमेवर धुमसलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानशी सध्यातरी कोणतीही बोलणी करू नये असे भाजपने म्हटले होते. यावेळी मात्र, भाजपनेच आपल्या भूमिकेच्या उलट क्रिया करत नवाझ शरीफ यांना निमंत्रण धाडले. असेही मनिष तिवारी म्हणाले.