गेल्या काही महिन्यांमध्ये काही मोठ्या नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत इतर पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. तर काही बड्या नेत्यांनी आधीच काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर कालांतराने इतर पक्षांमध्ये प्रवेश करत काँग्रेससाठीची डोकेदुखी वाढवली आहे. त्यामध्ये आता अजून दोन नावांचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत या दोन्ही नेत्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

आधी भाजपामधून काँग्रेसमध्ये आलेले माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनी आता तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नवी दिल्लीमधील ममता बॅनर्जी यांच्या शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. बिहारच्या दरभंगामधून किर्ती आझाद तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. २०१५ साली त्यांची तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर दिल्ली क्रिकेट असोसिएशनमधील गैरकारभाराविषयी टीका केल्याप्रकरणी भाजपामधून हकालपट्टी करण्यात आली होती. २०१९मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

दुसरीकडे एकेकाळी राहुल गांधींचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे अशोक तन्वर यांनी देखील तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अशोक तन्वर हे हरयाणा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष देखील राहिले आहेत. तसेच, हरयाणामधील सिरसा मतदारसंघातून ते खासदार म्हणून देखील निवडून आले आहेत.

तन्वर यांनी २०१९मध्येच काँग्रेसला रामराम ठोकून ‘अपना भारत मोर्चा’ची स्थापना केली. राज्यातील काँग्रेस नेत्यांशी झालेल्या वादांनंतर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता. विशेषत: हरयाणाचे मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांच्यासोबत देखील त्यांचे तीव्र मतभेद झाले होते.