अभिनेत्री कंगना रणौतने काही दिवसांपूर्वी भारताच्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. १९४७ साली मिळालेलं स्वातंत्र्य भीक असून २०१४ मध्ये देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं अशा आशयाचं हे विधान होतं. त्याचे पडसाद अजूनही उमटत असताना आता काँग्रेस नेत्यानेही असंच वादग्रस्त विधान केलं आहे. २०१४ पासून भारत अमेरिकेचा गुलाम झाला आहे, असा उल्लेख या काँग्रेस नेत्याने केलं आहे.

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी हे वक्तव्य केलं आहे. इंडो-रशिया फ्रेंडशिप सोसायटीच्या एका कार्यक्रमात अय्यर म्हणाले की, २०१४ पासून आपण अमेरिकेचे गुलाम झालो आहोत. अय्यर यांनी आपल्या भाषणात भारत रशिया संबंधांचा उल्लेख करत आपलं विधान सिद्ध करण्याचाही प्रयत्न केला.

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर म्हणाले की, “गेल्या 7 वर्षात आपण पाहत आहोत की, पक्षांतराची कोणतीही चर्चा होत नाही. शांततेची चर्चा नाही. ते अमेरिकन लोकांचे गुलाम बनून बसले आहेत आणि ते म्हणतात चीनपासून वाचलं पाहिजे. भारत-रशियाचे संबंध वर्षानुवर्षे जुने आहेत, पण मोदी सरकार आल्यापासून हे नाते कमकुवत झाले आहे, असे अय्यर सांगत होते. मणिशंकर अय्यर म्हणाले की, २०१४ पर्यंत रशियाशी आमचे जे संबंध होते, ते खूपच कमी झाले आहेत.

यापूर्वी मणिशंकर अय्यर यांनी मध्ययुगीन इतिहासाबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. ते म्हणाले होते, “अकबरने देशावर ५० वर्षे राज्य केले. हे लक्षात घेऊन मी राहत असलेल्या रस्त्याचे नाव अकबर रोड असे ठेवले. आमची हरकत नव्हती. महाराणा प्रताप रस्ता बनवा असे आम्ही कधीच म्हटले नाही, कारण आम्ही अकबराला आपलाच मानतो आणि त्याला परकं मानत नाही.