आर्थिक मंदीमुळे देशातील वाहन उद्योग संकटात सापडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाहनांची विक्री घटत चालली असून, वाहन कंपन्यांकडून रोजगार कपात केली जात आहे. अर्थव्यवस्थेची होत असलेली घसरण आणि वाहन उद्योगावर आलेल्या आर्थिक अरिष्टावरून काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारला सुनावले आहे. “लाखो भारतीयांच्या रोजगारावर टांगती तलवार आली आहे. सरकार डोळे कधी उघडणार?”, असा सवाल प्रियंका गांधी यांनी सरकारला केला आहे.

भारतीय अर्थव्यवस्था मंदी फेऱ्यात अडकत चालली असून, देशाचा जीडीपी (विकास दर) पाच टक्क्यांवर आला आहे. अर्थव्यवस्थेवर ओढवलेल्या आर्थिक संकटावरून काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सरकारवर टीका केली होती. “सरकारच्या चुकीमुळे अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. सरकारने घेतलेल्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची ही अवस्था झाली आहे”, अशी टीका करत “यातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी सरकारने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा”, असे आवाहन सिंग यांनी केले होते.

डॉ. मनमोहन सिंग यांच्यानंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनीही देशातील आर्थिक मंदीवरून सरकारवर निशाना साधला आहे. “अर्थव्यवस्था मंदीच्या खोल दरीत जाऊ लागली आहे. लाखो भारतीयांच्या रोजगारावर टांगती तलवार आली आहे. ऑटो सेक्टर आणि ट्रक सेक्टरमधील उत्पादन-ट्रान्सपोर्टेशनमध्ये घट झाली आहे. ही नकारात्मक वाढ बाजारपेठेचा विश्वास तुटत असल्याचेच संकेत आहेत. सरकार डोळे कधी उघडणार”, असे प्रियंका गांधी यांनी ट्विटवरून म्हटले आहे.

दोन दिवसांपूर्वी प्रियंका गांधी यांनी आर्थिक मंदीवरून सरकारवर टीका केली होती. “अर्थव्यवस्थेची वाट लावून सरकार मौन धरून बसली आहे. कंपन्या संकटात आल्या असून, व्यापारही ठप्प झाला आहे. कधी नाटक करून, छळ करून, तर कधी खोटं बोलून सरकार प्रचार करत आहे. असे करून सरकार देशाची अवस्था बिकट झाली असल्याचे लपवत आहे”, असा शाब्दिक हल्ला प्रियंका गांधी यांनी केला होता.